यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी आगमनानंतरच्या काळात पडलेल्या पावसाचा दिलासा कमी आणि तडाखाच जास्त बसला आहे. सांगली-कोल्हापुरातील महापुराच्या थैमानानंतर आणि त्याआधीही राज्यात अन्य काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. पुण्यामध्ये 25 सप्टेंबर रोजी घडलेली घटना ही ढगफुटीची होती. भारतीय हवामानशास्त्र विभाग हे नाकारत असला तरी पुणे शहरावर बरसलेले अब्जावधी लिटर्स पाणी हे स्पष्टपणे “फ्लॅशफ्लड’ म्हणजे “ढगफुटी’ची साक्ष देणारे होते.
सध्या राज्यात सर्वत्र लांबलेल्या मान्सूनची आणि काही काळात प्रचंड प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाची चर्चा आहे. विशेषतः पुण्यामध्ये गेल्या 15 दिवसांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. 25 सप्टेंबरच्या रात्री पुण्यामध्ये ढगफुटी झाली. एका तासात 140 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस दक्षिण पुण्यात कोसळला. टीआरएमएम या नासाच्या सॅटेलाइटवर देखील दर तीन तासांत होणाऱ्या नोंदीत ते स्पष्ट दिसून येते. या ढगफुटीमुळे 20 जीवांचे बळी गेले असून 900 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. हजारो चारचाकी व दुचाकी वाहने अचानक बरसलेल्या पाऊस व पुराच्या पाण्यात वाहून गेली. “स्मार्ट सिटी’ अशी ओळख असणाऱ्या पुण्यात शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आणि प्रचंड आर्थिक नुकसानही झाले. दिवसा वाढलेले तापमान, त्यामुळे होणारे बाष्पीभवन आणि स्थानिक पातळीवर बदललेले वातावरण यामुळे अचानक ढगांची निर्मिती होऊन सध्या जोरदार पाऊस होत आहे. अशा पावसाला कारणीभूत “क्युमोलोनिंबस क्लाऊड’ आहेत. स्थानिक वातावरणावरून अशा ढगांची निर्मिती होत असली तरी अरबी समुद्र किंवा बंगालचा उपसागर यामुळे आलेले प्रचंड बाष्पदेखील यात मिसळते व तीव्र पावसाची गंभीरता वाढवते. “क्युमोलोनिंबस क्लाऊड’ म्हणजे 2 किलोमीटर ते 15 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक उंचीपर्यंत वरच्या (ऊर्ध्व) दिशेने जाणारा पाणीदार ढग होय. तसेच त्याची लांबी 5 ते 20 किमी किंवा त्याहून जास्त इतकी असते. पुणे शहरातील दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढते. त्यातून अशा क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती झाली.
जमिनीवरील तापमान जास्त असल्याने खालून हवा वर जात असते. त्यामुळे हवेच्या दाबामुळे पाणीदार ढगांची निर्मिती होऊ लागते. सायंकाळनंतर तापमान कमी होते. त्यामुळे खालच्या स्तरावरील हवेचा दाब कमी होतो. तसेच पाणीदार ढगांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बाष्प साठते की, त्यामुळे ते जड होऊ वेगाने खाली येतात आणि मोठ्या टपोऱ्या थेंबासारखा जोरदार पाऊस पडू लागतो. हा पाऊस अत्यंत कमी वेळेत मर्यादित भागात कोसळतो. अशा ढगातून जास्तीत जास्त एक ते दीड तास सलग जोरदारपणे पाऊस होतो. अशा ढगांची व्याप्ती किती मोठी आहे, यावरून त्यातून किती पाऊस पडू शकते, असे ठरते. काही वेळा अशा ढगांमुळे एका तासात 100 मिमी म्हणजेच ढगफुटीच होते. पुण्यात आधीचे दोन दिवस याच “क्युमोलोनिंबस क्लाऊड’मुळे पाऊस होत होता आणि तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अक्षरशः ढगफुटी झाली.
या पार्श्वभूमीवर पुण्याचा विचार करता शहरात बुधवारी दिवसभर ऊन पडले होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत फक्त 0.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास गेल्या दोन दिवसांप्रमाणे जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अल्पावधीतच ढगफुटी झाली व शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. बुधवार रात्री 9 ते 11. 30 पर्यंत शिवाजीनगरला 43.3 मिमी पाऊस नोंद होती. मंगळवारी रात्री 3 तासांत 54 मिमी पाऊस झाला होता. तर सोमवारी केवळ 1 तासात 46 मिमी पाऊस झाला होता. नवी मुंबईची 4 सप्टेंबरला झालेली ढगफुटी ही “निंबोस्टेटस क्लाउड’ मुळे झाल्याचे लेखकाला संशोधनात आढळले आहे. हे ढग 2 ते 4 किलोमीटर उंचीत गडद थर होत गेलेले आणि 100 किलोमीटर लांबीपर्यंत देखील पसरट आढळतात. या ढगांतून देखील एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळतो. कधीकधी हे ढग दिवसभर संततधार पाऊस देतात हे मुंबईने 2005 पासून वारंवार आढळले आहे. या ढगांचे वैशिष्ट्य म्हणजे ढगफुटी होताना यात विजा चमकत नाहीत. डॉप्लर रडारवर हे ढग खूप आधीपासून ओळखता येतात.
यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी आगमनानंतरच्या काळात पडलेल्या पावसाचा दिलासा कमी आणि तडाखाच जास्त बसला आहे. सांगली-कोल्हापुरातील महापुराच्या थैमानानंतर आणि त्याआधीही राज्यात अन्य काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. साधारणतः 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त मिलीमीटर प्रति तास या दराने कोसळणारा पाऊस म्हणजे ढगफुटी होय. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून 25 सप्टेंबर रोजी पुण्यात कोसळलेला पाऊस ही ढगफुटी नसून अतिवृष्टी होती असे सांगितले जात असले तरी पुणे शहरावर बरसलेले अब्जावधी लिटर्स पाणी हे स्पष्टपणे “फ्लॅशफ्लड’ म्हणजे “ढगफुटी’ची साक्ष देते आहे. 65 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर अशा रेंजमध्ये कोसळणाऱ्या सर्व प्रकारच्या पावसाला हवामान खाते अतिवृष्टी म्हणते.
अतिवृष्टी म्हटले की किती पाऊस कोठे होणार याची कल्पना प्रशासनाला हवामान खाते देत नाही. त्यामुळे प्रशासनाला नीट निर्णय घेऊन कृती करता येत नाही, असे मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकारी सांगतात. याआधी 29 सप्टेंबर 2010 रोजी पुण्यात एनडीए येथे एका तासात 144 मिलीमीटर पाऊस पडला होता, तर 4 ऑक्टोबर 2010 रोजी पुण्यात पाषाणला दीड तासात 181 मिलीमिटर पाऊस होत ढगफुटी झाली होती. पाषाणला ढगफुटी होण्याआधीच याची सूचना प्रस्तुत दुपारी मी स्वत: प्रशासनाला दिली होती. त्यावेळी मी आयआयटीएम, पुणे येथे उपकरणे व निरीक्षण तंत्रज्ञान विभागात संशोधक म्हणून कार्यरत होतो. याआधीची म्हणजे 24 ऑक्टोबर 1892 रोजी पुण्यात 149 मिलीमिटर सर्वाधिक पावसाची अधिकृत नोंद आयएमडीकडे आहे. 100 मिलीमीटर प्रतीतास या दराने कोसळणाऱ्या पावसाला ढगफुटी म्हणजे “क्लाउडबस्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक अहवालात आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावर देखील तो तसा 2010 पर्यंत वर्षानुववर्षे उपलब्ध होता. डेन्मार्क, युके, युएस, पाकिस्तान, बांग्लादेश आणि भारतासह इतर अनेक देशातील संशोधक ढगफुटी म्हणजे “क्लाउडबस्ट’ या शब्दाचा वापर आपल्या वैज्ञानिक शोध निबंधात करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जात असूनदेखील ढगफुटी ही संकल्पनाच अस्तित्वात नाही असे दिशाभूल करणारे दावे आपल्याकडे केले जातात. ढगफुटी फक्त डोंगर किंवा पर्वत असलेल्या ठिकाणी होते असा दिशाभूल करणारा दावा 4 सप्टेंबरला मुंबई ढगफुटीच्या वेळी करण्यात आला होता. 60 लाखांपेक्षा जास्त लोक लोकल बंद पडल्याने यावेळी अडकले होते. उ
त्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी 100 मिलिमीटर प्रति तास या दराने होणारा पाऊस तो ढगफुटी, तर महाराष्ट्रात तसा होणारा पाऊस म्हणजे अतिवृष्टी अशी संदिग्धता निर्माण करणे अयोग्य आहे. चोवीस तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त होणाऱ्या प्रत्येक पावसाला हवामान विभाग अतिवृष्टी म्हणत आहे. महाराष्ट्रात ढगफुटी झाली तरी त्याला अतिवृष्टी असा शब्दप्रयोग करीत हवामान खाते त्याचे गांभीर्य कमी करते. शिवाय ढगफुटी झाली की हा 24 तासात झालेला पाऊस आहे असे सांगून हवामान खाते त्याची तीव्रता कमी करत जनतेची दिशाभूल करीत आपली जबाबदारी झटकते. अशा प्रकारांमुळेच अतिवृष्टी, महावृष्टी आणि ढगफुटी या संकल्पनांबाबत जनमानसात कमालीचा गोंधळ आहे. 65 मिलीमीटर पेक्षा पाऊस म्हणजे जास्त पाऊस (हेवी रेन), 65 ते 125 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस ( व्हेरी हेवी रेन), तर 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अत्यंत जास्त पाऊस (एक्स्ट्रीमली हेवी रेन ) अशी संकल्पना हवामान खाते (आयएमडी) वापरते. त्याऐवजी चोवीस तासांतील कोणत्या तासात पाऊस झाला, दरतासाला किती मिलीमीटर पाऊस झाला हे वर्गीकरण हवामान खाते नागरीकांना सांगू शकले तर ते हवामान खात्याचे मोठे यश असेल.
जगातल्या अनेक देशांमध्ये तासानुसार हवामानाचे बदल दिले जातात. हवामानाचा नेमका अंदाज इस्त्राइल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका; तसेच अन्य पाश्चात्य देशांमध्ये बांधला जातो. परदेशात हवामानाची अचूक माहिती ही थेट जनतेच्या जीविताशी जोडलेली असते. जपान, तैवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आदी अनेक देशात हवामानाची माहिती नागरिकांना अगदी अचूक आणि दर 10 मिनिटात मोबाईल फोनवर अपडेट्ससह मिळते. जनतेशी तेथील प्रशासनाची नाळ जोडली गेलेली आहे, त्यामुळे तिला प्राधान्य दिले जाते. मात्र भारतात हवामान अंदाज बरोबर येण्याऐवजी वारंवार चुकतात.
किरणकुमार जोहरे
हवामान तज्ज्ञ, पुणे