सासवड येथे संभाजी कुंजीर यांची टीका
दिवे – महात्मा गांधीनी कॉंग्रेसची स्थापना देशाच्या एकात्मता, अखंडता आणि विकास होण्यासाठी केली होती. परंतु सध्याच्या नेतृत्वाने मात्र, कॉंग्रेस म्हणजे स्वतःची जहागिरी करून ठेवली आहे. या पक्षात सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळत नसून ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे. अशांनाच येथे संधी मिळते.
मात्र ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचले अशा व्यक्तींना; मात्र अत्यंत वाईट वागणूक मिळते, हे संपूर्ण जिल्ह्याने पहिले आहे. त्यामुळे अशा पक्षात राहून समाजाचे हित नाही. यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यांना जनतेच्या हिताचा विचार महत्त्वाचा नाही, अशा व्यक्तींना सत्तेत बसू देवू नका, अन्यथा तालुक्याचे वाटोळे होईल, अशा शब्दात माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सासवड (ता. पुरंदर) येथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचार निमित्त माजी आमदार कुंजीर हे सासवड येथे बोलत होते.
संभाजी कुंजीर म्हणाले की, तालुक्यात आगामी काळात येणारा गुंजवणी प्रकल्प आणि विमानतळ प्रकल्प केवळ विजय शिवतारे हेच पूर्ण करू शकणार आहेत. हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही स्वप्नातल्या विकासाला थारा न देता त्यांना त्यांची जागा दाखवा असे जाहीर आवाहन त्यांनी केले.
हवेलीचे शिवसेना नेते शंकर नाना हरपळे म्हणाले की, संजय जगताप यांचा हवेलीत कोणताही संबंध नाही, तरीही मी हे काम केले मी ते काम केले असे सांगतात, त्यामुळे आता आपणच ठरवा कोणी काय कामे केली, अशा शेलक्या शब्दात संजय जगताप यांचा समाचार घेतला. तर राहुल शेवाळे गिरीश जगताप, विष्णू दादा भोसले, दिलीप यादव यांनीही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे.