महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार सध्या अल्पमतात गेल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर आता स्वतः शिंदे यांनी भाष्य केलं आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे असल्याच स्वतः एकनाथ शिंदे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी पहाटेच सुरतेहून गुवाहाटीला प्रस्थान केलं. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत सेनेचे ३३ आणि अपक्ष ७ असे एकूण ४० आमदार असल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी शिंदे यांना भेटायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर सुरतमधील हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली.
यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही असं म्हणत शिंदे यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नसल्याचं देखील ठणकावून सांगितलं. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहेत असं देखील शिंदे यावेळी म्हणाले.
बंडाचा निर्णय का घेतला असं विचारल्यावर, मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि पुढेही राहणार. काल आज आणि उद्या बाळासाहेबांचा सैनिकच राहणार. माझ्यासोबत जोरजबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. ४० हुन जास्त आमदार स्वइच्छेने माझ्या सोबत आले असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी स्वतः एका वृत्त वाहिनीशी बोलताना हा खुलासा केल्याने महाविकास आघाडी सरकारचे धाबे दणाणले आहे.