नाशिक – राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून काही ठिकाणी अटीतटीच्या लढती रंगण्याची शक्यता आहे. परंतु, काही ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यासाठी नाशिकमध्ये चक्क सरपंचपदासाठी तब्बल २ कोटींची बोली लागली असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून हीच का लोकशाही असा प्रश्न जनमाणसातून विचारला जात आहे.
नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणे कांद्याची मोठी बाजारसमिती असलेले गाव आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते.
यानुसार ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर महाराज मंदिराच्या आवारात लिलावात बोली लावण्यात आली आहे. १ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेला हा लिलाव २ कोटी ५ लाखावर पोहोचला.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकला आहे. लिलावाचा हा पैसा रामेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.