सहा बालनाट्यांचे अभिवाचन “नाट्यसंस्कार’च्या महोत्सवात
पुणे – मार्च महिन्यापासून रंगभूमीचा पडदा बंद असल्याने नाटकांचे प्रयोग झाले नाहीत. याला प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांसह बाल रंगभूमी देखील अपवाद नव्हती. सुमारे दहा महिन्यानंतर बालनाट्याचा पडदा उघडला असून, पुन्हा एकदा बालनाट्य पाहता येणार आहेत.
मागील काही आठवड्यांपूर्वी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग सुरू झाले. मात्र, बालनाट्यांबाबत साशंकताच होती. अभिवाचनाच्या निमित्ताने बालरंगभूमीचा पुन्हा एकदा पडदा उघडला. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने अभिवाचन महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये अकादमीच्या कलाकारांनी सहा बालनाट्यांचे अभिवाचन केले. अकादमीच्या जुन्या आणि नवीन तुकडीच्या कलाकारांनी अभिवाचन केले.
दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा बालनाट्य महोत्सव घेणे शक्य नसल्याने बालनाट्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले. “बिन कपड्यांचा राजा’ या बालनाट्याच्या अभिवाचनाने महोत्सवाला सुरुवात झाली.
“गांधी व्हायचंय आम्हाला’, “प्रिय बाबा’, “सावल्या’, “पिटुकल्याची गोष्ट’, “अळी मिळी गुपचिळी’ या बालनाट्यांचे अभिवाचन झाले. अकादमीचे प्रमुख प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीया देशपांडे हिने केले.