मुंबई – मादक द्रव्य प्रकरणात आर्यन खान निर्दोष असल्याची बाब आज एनसीबीच्याच अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर भाजप विरोधी राजकीय पक्षांनीही आता जोरदार उचल खाल्ली आहे.
या संबंधात प्रतिक्रीया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रॅस्टो यांनी म्हटले आहे की, आर्यन खान याला या प्रकरणात खोटेपणाने अडकवले गेले असल्याचे आज सिद्ध झाले आहे. पण या साऱ्या प्रकरणात आर्यनाला ज्या भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागले आणि त्यातून त्याच्या मनावर जो विपरित परिणाम झाला त्या स्थितीला जबाबदार कोण?.
कॉंग्रेस पक्षानेही या प्रकरणात भाजपला लक्ष्य केले आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठीच अशा प्रकारची विपरीत प्रकरणे मुद्दाम घडवली जात आहेत असा दावा आम्ही पहिल्या दिवसापासून करीत होतो.तो खरा ठरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुसरे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे की आर्यनवरील कारवाई बोगस आहे असे नवाब मलिक यांनीही पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते ते आज खरे ठरले आहे.
या प्रकरणात साक्षीदारांकडून कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या गेल्या आणि यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला याचीही चौकशी केली पाहिजे आणि वानखेडे यांनीच त्याची उत्तरे दिली पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे. मलिक यांनी जे सत्य समोर आणले त्याचीच किंमत आज नवाब मलिक यांना मोजावी लागत आहे असेही तपासे यांनी म्हटले आहे.