Bhojpali Baba Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जन्मभूमीवर रामलालाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. गर्भगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पहिल्या मजल्याच्या बांधकामाचे काम सुरू आहे. 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मोजक्या व्यक्तींनाच निमंत्रणं पाठवली जात आहेत. यामध्ये राजकीय व्यक्ती तसेच आध्यात्मिक व्यक्तींना विशेषत: निमंत्रण पाठविले जात आहेत. भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही निमंत्रणाचे पासेस दिले आहेत. ज्यांना हे पास मिळतात त्यांना मोठा आनंद झाल्याचे ते सांगत आहेत. दरम्यान, जोवर राम मंदिर उभारलं जात नाही, तोवर लग्न करणार नाही, अशी 31 वर्षांपूर्वी शपथ घेतलेले भोजपाली बाबा (रविन्द्र गुप्ता) यांनाही निमंत्रण मिळाले आहे.
कोण आहेत भोजपाली बाबा –
मध्य प्रदेशातील बैतुल येथे सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्या भोजपाली बाबांना अयोध्या श्री राम मंदिरातील रामललाच्या अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. आमंत्रण मिळाल्याने बाबा आनंदी आहेत आणि त्यांचे भक्तही आनंदी आहेत. भव्य राम मंदिर बांधले जाईपर्यंत अविवाहित राहणार असल्याची प्रतिज्ञा बाबांनी घेतली होती. बाबांचा संकल्प पूर्ण झाला असून त्यांना अयोध्येला पाठवण्याची तयारी गावकरी करत आहेत.
भोजपाली बाबा हे मूळचे भोपाळचे असून वयाच्या 21 व्या वर्षी कारसेवकांसोबत अयोध्येला गेले होते, तेव्हापासून त्यांनी भव्य श्री राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. तत्त्वज्ञान आणि अन्य एका विषयात एमए करण्यासोबतच त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले आहे. भोजपाली बाबांचे कुटुंब संघ पार्श्वभूमीचे आहे. लहानपणापासूनच त्यांनी देशभक्तीचे काम केले आहे. 1992 मध्ये भोजपाली बाबा राम मंदिरासंदर्भात कारसेवकांसह अयोध्येला गेले होते.
बाबांनी वयाच्या 21 व्या वर्षी हा संकल्प केला होता –
भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी बाबांनी 21 वर्षे अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा घेतली आणि ते सनातन धर्माचे संन्यासी झाले. बाबांनी काही दिवस वकिलीही केली असली तरी त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि तीन भाऊ आहेत. जेव्हा बाबा कुटुंबातून निघून गेले तेव्हा आईने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण बाबा थांबले नाहीत आणि घरातून निघून गेले. बाबांनी नर्मदेची तीनदा प्रदक्षिणा केली. परिक्रमेदरम्यान त्यांच्या आईचे निधन झाले होते, परंतु परिक्रमा अपूर्ण राहिल्याने ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत.
भोजपाली बाबा गेल्या 10 वर्षांपासून बैतुलच्या मिलनपूर गावात आहेत आणि मंदिरात प्रार्थना करत आहेत. बाबा हे विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री असून सनातन धर्माचा प्रचार करत आहेत. देशात सनातन धर्माची स्थापना करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा पाया रचला गेला, असे बाबांचे मत आहे. दरम्यान, आता त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून ते आता लग्न करणार की अविवाहितच राहणार हे पहावे लागणार आहे.