मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असून वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे.
यावर विरोधकांनी खोटे दावे केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला. मॉस्को दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता कंपनीचे अध्यक्ष अग्रवाल यांच्या भूमिकेवर आभार मानत ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मला खेद होतो की, केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे विरोधकांकडून केले जात आहेत.
पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला. हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रित करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर! अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.