पी.चिदंबरम यांचा केंद्र सरकारला सवाल
नवी दिल्ली : देशात सध्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून रणकंदन सुरू आहे त्यातच आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. जे आधीपासूनच पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्यांना आता भारताचे नागरिकत्व का दिले पाहिजे, असा प्रश्न पी चिदंबरम यांनी केला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशात सध्या आंदोलन सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला.
चिदंबरम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जे आधीपासून पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्यांना भारतीय नागरिकत्व का दिले पाहिजे. विरोधकांपुढे अशा आव्हानांचा अर्थ काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भात एकूण 60 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावरच बुधवारीच सुनावणी होणार आहे.
चिदंबरम यांनी म्हटले आहे की, देशातील विद्यार्थी, तरूण पिढी उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, सहिष्णू आहे. त्यांच्याकडून मानवतेसाठी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार या मूल्यांनाच आव्हान देऊ इच्छिते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. काही ठिकाणी सुधारित कायद्याविरोधात मोर्चाही काढण्यात आला. दिल्लीमध्येही आंदोलक आक्रमक झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली.