बुलढाणा – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा काल बुलढाण्यात होती यादरम्यान भास्तान येथे राहुल गांधींची सभा पार पडली. मात्र सभेत अनुचित प्रकार घडल्यामुळे राहुल गांधींनी आपलं भाषण आटोपत घेतलं आणि सभा संपवली. शहीद झालेल्या ७३५ शेतकऱ्यांना सभेत श्रद्धांजली वाहताना हा प्रकार घडल्याने राहुल गांधी चांगलेच संतापले.
महागाई आणि रोजगार हे दोन प्रमुख मुद्दे भारत जोडो यात्रेच्या केंद्रस्थानी आहेत. राहुल गांधी देखील यावरूनच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना दिसत आहेत. भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केले होते त्यातील ७३५ शेतकरी शहीद झाले होते. सभेमध्ये या शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली जात असताना अचानक बाजूला फटाके फुटू लागल्याचे चित्र दिसून आलं. यावेळी राहुल गांधी चांगलेच संतापले.
शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त केला जात असताना अज्ञातांनी फटाके फोडल्याने आयोजकांनी देखील संताप व्यक्त केला. राहुल गांधींनी यावेळी नाराजी व्यक्त करत पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच कोणीतरी हे जाणूनबुजून करत असल्याचे म्हणत राहुल गांधींनी निषेध व्यक्त केला. लवकरात लवकर भाषण संपवून सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींनी सभा आटोपती घेतली.