शासनाकडून सुरक्षितता नियमात बदल
पुणे – मोठ्या उद्योगांसाठी सध्याचे सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाबाबत जे नियम आहेत ते छोट्या उद्योगांनाही लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, तसे झाल्यास आगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या छोट्या उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. त्यांच्या उत्पादकतेवर व रोजगारावर परिणाम होईल. त्यामुळे हे नियम छोट्या उद्योगांना लागू करू नये, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने उद्योग मंत्रालयाकडे केली.
एखाद्या उद्योगांमध्ये पाचशेपेक्षा अधिक कामगार काम करीत असतील तर, फॅक्टरी कायद्याप्रमाणे त्याठिकाणी कामगार कल्याण अधिकारी नेमावा लागतो. मात्र, नव्या नियमानुसार कामगारांची संख्या कमी होणार आहे. कामगार अधिकाऱ्यांबरोबरच कॅन्टीन आणि इतर सवलती द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे खर्च वाढून ताळेबंदावर परिणाम होणार आहे.
रोजगार निर्मितीवरही परिणाम
नवा नियम फक्त वस्तू निर्मिती क्षेत्रच नाही तर व्यापार, व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांना लागू होणार आहे. हा नवा नियम लागू होऊ नये आणि खर्च वाढू नये यासाठी छोटे उद्योग विस्तारीकरणाचे काम लांबणीवर टाकतील. त्यामुळे या उद्योगांच्या उत्पादकतेबरोबरच रोजगार निर्मितीवरही परिणाम होण्याचा धोका असल्याचे उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी सांगितले. त्याचबरोबर या नियमाचा भंग केल्यानंतर दंड आणि फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस केली आहे.