अनिल गुंजाळ
जयचा सत्कार चालू होता. सत्कार करणारी सर्व ज्येष्ठ मंडळी अजयबद्दल भरभरून बोलत होती. आम्हा सर्व वृद्धांची खूप काळजी घेतो, आम्हाला काही हवं नको ते पाहतो. आमच्या आरोग्याची, औषधपाण्याची काळजी घेतो. अजय आमचा नातू आहे. त्याच्यामुळेच आम्ही आत्मविश्वासाने घराबाहेर पडतो. जीवनाच्या उत्तरार्धात आनंद घेत आहोत. आम्हाला देशातील, महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे पाहता आली. त्याचबरोबर परदेशाची वारीही घडली आहे. आम्हा ज्येष्ठांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेत.
समारंभातील प्रत्येकजण अजयविषयी भरभरून बोलत होता. अजयने स्वत:च्या पर्यटन कंपनीमार्फत या सर्व आजी आजोबांना जीवनाच्या वळणावर आनंद देण्याचा जणू संकल्प केलेला आहे. हा समारंभ व मुलाचे कौतुक त्याचे आईवडील कौतुकाने पाहत होते. गेल्या आठ ते दहा वर्षांतील त्याची प्रगती अभिमानास्पद होती. अजून अजयचे लग्न व्हायचे होते.
समारंभ सुरू असताना आईला त्याचे बालपण, त्याच्या आवडी निवडी त्याच्यातील फिरण्याची हौस, दुसऱ्याला सतत मदत करण्याची भूमिका आठवत होती. श्री. व सौ. जगताप दाम्पत्यांना दोन मुले त्यातील थोरला सुजय अतिशय हुशार, फक्त अभ्यास एके अभ्यास, एवढाच त्याचा छंद होता. त्याला खेळणे माहीत नव्हते की कधी मित्रमंडळीत जायचा नाही. विशेष अशा मित्रमैत्रिणीही त्यास नव्हत्या. या दोघांमध्ये पाच वर्षांचे अंतर असेल. सुजयने दहावी परीक्षा नव्वद टक्क्यांनी तर बारावी परीक्षा सत्याऐंशी टक्क्यांनी उत्तीर्ण केली होती. तसेच जेईईच्या माध्यमातून त्याने आयआयटी मधून परीक्षा देऊन संगणक अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. उत्तम पगाराची नोकरी मिळवून आता परदेशात आहे, याचा आईवडिलांना खूप अभिमान वाटायचा आणि अजयची सतत चिंता वाटायची. याचं कसं होणार, हा अभ्यासच करत नाही, कधी अभ्यासात लक्ष घालणार नाही, शालेय जीवनापासून याला फिरण्याची हौस होती. नवनवीन ठिकाणे पाहण्यासाठी मित्रांना गोळा करायचे व शहरातील ऐतिहासिक, ठिकाणे पाहायची, त्याचे रविवारही ठरलेले असायचे. कधी बस तर कधी सायकलचा प्रवास असायचा. याचा परिणाम म्हणून दहावीच्या परीक्षेत तो नापास झाला.
आईची चिंता वाढली. कसे व्हायचे आता ही चिंता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. किमान चार परीक्षा झाल्या तरी पोरगं पास व्हायला तयार नाही, फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचा, जमेल तेवढा अभ्यास करायचा. पास, नापास याची चिंता करायची नाही हा त्याचा स्वभाव होता. परंतु प्रत्येक दिवस आनंदाने घालवणे, दररोज नवनवीन ठिकाणे, दुर्ग, गड, ऐतिहासिक किल्ले यांची माहिती मिळविणे व ट्रेकिंग करणे त्याचे चालूच होते. श्री. व सौ. जगताप यांची सरकारी नोकरी होती. थोड्याच दिवसांत दोघेही सेवानिवृत्त होणार होते. यामुळे त्यांना याची चिंता सतत वाटायची.
अजयचा प्रश्न घेऊन सौ. जगताप शाळेच्या शिक्षकांकडे, समुपदेशकांकडे जात होत्या. एकदा मुलांचे समुपदेशन गायकवाड यांनी केले आणि अजयला दहावी पास होणे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले. तू पास झालास तर तुला पुढील आवडते शिक्षण घेता येईल. स्वत:चा व्यवसाय करता येईल व एक दिशा मिळेल याची जाणीव त्याला करून दिली. अजयने मनावर घेतले. मुळातच हुशार असलेला अजय दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने कॉमर्स शाखेतून बारावीची परीक्षाही पूर्ण केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. फिरण्याची हौस पदवी मिळेपर्यंत सुरूच होती. पदवीनंतर त्याने ट्रॅव्हल व टुरिझमचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. काही दिवस, प्रसिद्ध एका कंपनीत नोकरीही केली. नंतर स्वत:ची कंपनी सुरू केली. आज त्याचा व्यवसाय उत्तम सुरू होता. त्याचेच फळ म्हणून हा सत्कार समारंभ होता.
आजपर्यंत देशातील अनेक सहली त्याने आयोजित केल्या आहेत. स्वत:च्या आनंदाबरोबर दुसऱ्यास आनंद देणे हा त्याचा स्वभाव त्याच्या व्यवसायात त्याला मदतच करत होता. आता अजयचा आईवडिलांना अभिमान वाटत होता. कंपनीची देशात दोन कार्यालये उघडली होती.
आई आणि वडील यांना आता त्याच्या लग्नाचे स्वप्न पडू लागले होते. आई मोठ्या मुलाचे लग्न झाल्याविना धाकट्याचे कसं करू असं म्हणत होती. मोठा त्याच कंपनीत परदेशात काम करत आहे. त्याला लग्न कर म्हणाले तर थांबा थोडे दिवस असे सांगत होता.
इकडे मात्र धाकटा अजय व्यवसायात आनंदी होता. आईला आता सुजयची चिंता लागून राहिली होती. त्याला लग्न करण्यासाठी विनवणी करत होती आणि हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होता. आई मोठ्यासाठी मुली पाहत होती आणि हा सून कधी घेऊन येऊ? असं आईला विचारत होता. आता प्रश्न आईला असा पडतो की नक्की दोघांपैकी हुशार कोण? अजय की सुजय? त्यांना आता पटले होते की दोघेही हुशार आहेत, यापुढे दोघांची तुलना कधीच करायची नाही असे त्यांनी ठरविले होते. समुपदेशक गायकवाड यांचे वाक्य त्यांना आठवत होते. दोघेही हुशार आहेत, नव्हे प्रत्येकजण हुशार असतो. प्रत्येक मुलांत देवाने एक तरी गुण जन्मत: दिलेला असतो. ती त्यांची दैवी देणगी असते. ती ओळखून त्याला करिअर निवडता आले पाहिजे आणि आनंदाने जगता आले पाहिजे. यश अपयश काहीच नसते. त्याकडे सकारात्मकतेने पाहता आले पाहिजे. त्यांनी सांगितलेला मंत्र त्यांना आता वारंवार आठवत होता.