नगर (प्रतिनिधी) – विरोधात वागणाऱ्यांचा बदला घेण्याची भाजपची मानसिकता भारतीय लोकशाहीसाठी घातकच आहे. कोणत्याही सत्तेचा मुकूट कायमस्वरूपी नसतोच मुळी. त्यातही राजकारणात मतभेद जरूर असावेत. परंतु मनभेद कधीही नसावेत. स्वच्छ व निर्मळ राजकारण करावे. सत्तेचा गैरवापर करून ईडी, सीबीआय मागे लावत चाललात, तर एके दिवशी लोकच आक्रमक होतील आणि जाब विचारतील. विरोधात वागणाऱ्यांना ईडीची नोटीस देवून घाबरवण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे बूड नसलेले नेतृत्व आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पाटील यांच्या “मी पुन्हा कोल्हापूरला जाईल’ या वक्तव्याची देखील वडेट्टीवार यांनी खिल्ली उडविली. ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी वडेट्टीवार नगरमध्ये आले होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली.
ते म्हणाले, बूड नसेल तर टिकावे कुठे? असा प्रश्न पडत असतो. चंद्रकांत दादा पाटील हे त्यातीलच एक आहेत. बूड नसलेले ते नेतृत्व आहे. “सांगा आता मी कुठे स्थिर राहू’ अशी त्यांची अवस्था झालेली आहे. कुठेच जागा नसली की माणूस झाडाखाली थांबतो. सूर्य जशी दिशा बदलेल तसे त्याला झाड बदलावे लागते. तशी अवस्था चंद्रकांत दादा पाटलांची झाली आहे. मात्र, त्यांनी एक लक्षात ठेवावे की राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली असता, आता ते पुणे काय किंवा कोल्हापूर काय, कुठेही स्थिरावू शकत नाहीत.
भाजपवरही मंत्री वडेट्टीवार यांनी कठोर टीका केली. ते म्हणाले, ओबीसी नेतृत्त्व मोठे होऊ द्यायचे नाही, ही भाजपची भूमिका असते. स्व. गोपीनाथ मुंडे, आता पंकजा, चंद्रकांत बावनकुळे, विनोद तावडे, महादेव शिवणकर, गुडधे पाटील ही नावे पाहिली की तेच लक्षात येते.
एकनाथ खडसेंचा बदला घ्यायचा आहे…!
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिलेली “ईडी’ची नोटीस हे देखील बदल्याचेच राजकारण आहे. बदला घेण्याची मानसिकता भाजपमध्ये आहेच. ती या प्रकरणातून प्रकर्षाने जाणवते. परंतु सत्तेचा असा गैरवापर भाजपने करू नये, असा सल्लाही वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.
—