पारनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडनेर हवेली येथे अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने नागरिकांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली आहे. तसेच काही पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. गुरुवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील कालवडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात कालवड मृत झाली आहे. याबाबत वनविभागाने पंचनामा केला आहे.
वडनेर हवेली येथील शेतकरी शरद भालेकर यांच्या गोठ्यातील सात ते आठ महिन्याच्या कालवाडीवर बिबट्याने हल्ला केला. पहाटेच्या सुमारास हल्ला केल्याने कोणाच्या लक्षात आले नाही. या हल्ल्यामध्ये कालवड ठार झाली. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर शेतकरी शरद भालेकर यांनी याबाबतची माहिती गावात कळवली. त्यानंतर सतीश भालेकर यांनी वनरक्षक अश्विनी साळुंके यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी त्वरित आपल्या पथकासह येथे भेट दिली. तसेच परिसरामध्ये पाहणी केली.
येथे बिबट्याचे पावलाचे ठसे आढळून आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा हल्ला बिबट्याने केला आहे, असे त्यांनी सांगितले. वासराचा पंचनामा करून शासकीय मदत मिळण्यासाठीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे वनरक्षक साळुंके यांनी सांगितले आहे. वडनेर हवेली येथे अनेक महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. या दहशतीखाली नागरिकांना आपले दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. वनविभागाने येथे बिबट्यासाठी पिंजरा लावलेला आहे. मात्र, त्या पिंजऱ्यात अद्याप बिबट्या कैद झाला नाही.
वडनेर हवेली येथे गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे पाहणीत लक्षात आले आहे. त्यानंतर तेथे पिंजरा लावण्यात आला. ज्या ठिकाणी कालवडीवर हल्ला करण्यात आला आहे, त्या परिसरामध्ये हा पिंजरा हलवण्यात येणार आहे.
अश्विनी साळुंके, वनरक्षक, पारनेर.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 25) पहाटे पाचच्या सुमारास पारनेर येथील पाटाडी वस्ती येथील सुभाष औटी यांच्या घरासमोर पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी आवाज झाल्याने घरातील लोक बाहेर आल्यामुळे बिबट्याने जबड्यातील कुत्रा सोडून देत तेथून पळ काढला असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.
या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या परिसरामध्ये तरस असल्याचे सांगितले. बिबट्या कुत्र्यावर हल्ला करत नाही असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच परिसरामध्ये पाहाणी केल्यानंतर तरसाचे पावले असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनी याबाबत धसका घेतला असून वन विभागाने येथे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात येत आहे.