जयपूर – केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवत राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (रालोप) शनिवारी केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडला. त्यामुळे कृषी कायद्यांवरून भाजपची साथ सोडणारा रालोप हा शिरोमणी अकाली दलानंतरचा दुसरा पक्ष ठरला आहे.
राजस्थानमधील पक्ष असणाऱ्या रालोपचे नेतृत्व खासदार हनुमान बेनिवाल करतात. ते पक्षाचे एकमेव खासदार आहेत. एनडीए आणि विशेषत: भाजपचे संख्याबळ पाहता रालोपने फारकत घेतल्याने मोदी सरकारला कुठलाही धोका नाही. मात्र, त्या पक्षाचा निर्णय सरकार आणि भाजपच्या दृष्टीने राजकीय धक्का मानला जात आहे.
कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी बेनीवाल यांनी काही दिवसांपूर्वी तीन संसदीय समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करतानाच बेनीवाल यांनी समर्थक आणि शेतकऱ्यांसमवेत दिल्लीकडे कूच केले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलले आहे.
रालोपआधी सप्टेंबर महिन्यात पंजाबमधील महत्वाचा राजकीय पक्ष असणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएबरोबरचे संबंध तोडले. आता कृषी कायद्यांना होणारा विरोध वाढू लागल्याने मोदी सरकारची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.