पुणे – हल्ली गिधाडे सापडत नाहीत म्हणून पारशी समाज बांधवांनी आता विद्युतदाहिनीत अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला आहे. एखाद्या समाजाच्या हजारो वर्षांपासूनच्या अशा परंपरा अचानक का बदलाव्या लागल्या याचे कारण हे निसर्गातच लपलेले आहे. या स्थितीला जबाबदार वेगाने वाढत असलेली मानवी वस्ती, निसर्गाचा ऱ्हास हेच म्हणावे लागेल.
“आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवसा’च्या निमित्ताने पुन्हा एकदा हा विषय ढवळून निघाला आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या शनिवारी या दिवशी पक्ष्याच्या या प्रजातीविषयी ऊहापोह तसेच त्यांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर जागतिक पातळीवर चर्चा होते. आज (दि. 2 सप्टेंबर) या पक्ष्याविषयी लोकांमध्ये जागृती करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
गिधाडांची संख्या कमी का होते?
गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय, अशी भिती पक्षी आणि पर्यावरणप्रेमींना वाटते आहे. खरेतर या पक्षांची शिकार कोणी करत नाही, त्यांचे खाद्यही कमी झाले नाही, असे असताना गिधाडांची संख्या कमी होत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे औषधे आणि रसायने. औषधे आणि रसायनांमुळे पाळीव प्राण्यांना आजारपणामध्ये वेदनाशामक म्हणून “डायक्लोफिनॅक’ हे औषध रसायन दिले जाते. असे औषधोपचार झालेला प्राणी मृत झाला आणि त्याला गिधाडांनी खाल्ले तर ते औषध त्यांच्या शरीरात जाते.
त्यामुळे गिधाडांना अनेक व्याधी होतात. ती मरतात किवा त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम होतो. अपरिपक्व कवच विरहित अंडी तयार होतात. त्यामुळे नवीन पिल्ले जन्मास येत नाही. भारत सरकारने पाळीव प्राण्यासाठी “डायक्लोफिनॅक’ या औषधावर बंदी आणलेली आहे. परंतु मानवी आजारासाठी हे उत्तम औषध असल्याने ते आजही बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
“बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बर्डस्’ यांच्या सल्ल्यानुसार हरियाणा, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्य सरकारांनी अनुक्रमे पिंजोर, बुक्साराणी आणि गौहाटी या ठिकाणी गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे चालू करून जगात केवळ एक टक्के शिल्लक राहिलेल्या प्रजातींच्या पिल्लांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. “डायक्लोफिनॅक’चा अंशही नसलेले बकऱ्यांचे मांस या पिल्लांना खाऊ घालण्यात येते. मे 2013 पर्यंत या संगोपन केंद्रातील गिधाडांची संख्या 250 वर गेली आहे.
गिधाडांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
- 1980 पर्यंत भारतात चार कोटी पेक्षा जास्त संख्या होती
- सध्या देशात संख्या 90 ते 95 टक्के इतकी घटली आहे.
- अंटार्क्टिका आणि ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात.
- निसर्गात सफाई कामगार (स्कॅव्हेंजर्स) म्हणून महत्वाचे स्थान
- फक्त मृत प्राण्यांचेच मांस भक्षण करुन करतात
- निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा दुवा
- निसर्गाला रोगमुक्त ठेवण्यास मदत करतात
- जमिनीवरील एकमेव कशेरुकी (Vertibrate) प्राणी