सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फालतू विषयावर खूप बोलतात पण ते लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांवर कधी बोलणार असा सवाल कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे. आज येथील प्रचार सभेत बोलताना त्या म्हणाल्या की देशातील शेतकरी अडचणीत आहेत. पण मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांचे तब्बल पाच लाख 50 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले आहे. त्यांच्या उद्योगपती मित्रांनी गेल्या पाच वर्षात किमान दहा हजार कोटी रूपयांचा नफा कमावला आहे. मोदींचा उल्लेख त्यांनी अहंकारी नेते असा केला. त्यांनी केवळ राग, द्वेष आणि नकारात्मकता फैलावली असाही आरोप त्यांनी येथील सभेत बोलताना केला.
त्या म्हणाल्या की महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, मध्यप्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊन निदर्शने केली त्यावेळी आपल्या बंगल्यातून बाहेर येऊन त्यांच्याशी पाच मिनीटेही बोलण्याचे सौहार्द त्यांनी दाखवले नाही. आज ते शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रूपये देण्याची भाषा करतात. पण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली त्यावेळी सरकारकडे पैसे नाहीत असे उत्तर त्यांनी दिले होते असे त्यांनी नमूद केले. जर तुमचा हेतू चांगला असेल तर तीन दिवसांत शेतकऱ्यांची कर्ज माफी करता येते हे आम्ही मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात करून दाखवले आहे. आज तुम्ही जनतेमुळे तुमच्या पदावर आहात हे विसरू नका. जनते मध्ये नकारात्मकता पसरवू नका असे सल्लेही प्रियांकांनी त्यांना दिले.
पंतप्रधान मोदी जेव्हा तुमच्या समोर येतात त्यावेळी ते तुमच्या समस्यांवर कधीच बोलत नाहींत. ते केवळ पाकिस्तान आणि अन्य फालतू विषयांवर बोलतात. त्यांनी सरकारी पैशांवर जगाची सफर केली, बिर्याणी खायला ते पाकिस्तानात गेले, जपान आणि अन्य ठिकाणी जाऊन त्यांनी ढोल वाजवले, अमेरिका आणि युरोपचेही त्यांनी दौरे केले पण आपल्या मतदार संघातील एकाही गावाला जाऊन तेथील गावकऱ्यांची समस्या ऐकून घेण्यास त्यांना वेळ मिळाला नाही असा आरोपही त्यांनी केला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाच वर्षात पाच कोटी लोकांचे रोजगार आणि नोकऱ्या गेल्या असा आरोपही त्यांनी केला.