सांडपाणी राजरोसपणे सोडले जाते उघड्यावर
वाघोली -हवेली तालुक्यात विविध परिसरात सांडपाणी एकत्रित करून ते ओढ्या-नाल्यांत किंवा पडिक शेतांमध्ये सोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे या परिसरातील पाणवठे दूषित होऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी वारंवार मागणी नागरिक करीत आहेत, पण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी वापर होणाऱ्या विहिरी आता दूषित होऊ लागल्या आहेत. यावर मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कनाडोळा केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला . तसेच सांडपाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
सांडपाणी संकलनाचा व्यवसाय तेजीत
गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सांडपाण्याची व्यवस्था आजही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पुरेशी नाही आहे. हे मैलापाणी संकलित करण्यासाठी अनेकांनी चारचाकी वाहनांवर त्या टाक्या उभ्या करून मोटरद्वारे हे पाणी संकलित केले जाते. त्या पाण्याची गावापासून दूर अशाठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याचा धंदा सुरू केला आहे. याद्वारे लाखो रुपयांची कमाई करण्यात येत आहे.
संबंधितांवर कारवाईची गरज सांडपाणी संकलित करणारी वाहने ही जुनी असल्याचे दिसून येत आहे. शिवाय योग्य त्या परिवहन विभागाच्या परवानग्या अशा वाहनांनी न घेतल्याचे काही वाहनांच्या चौकशीमधून उघड झाले आहे. खेडेगावांमध्ये तसेच शहरांमध्ये अशी वाहने राजरोसपणे रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. त्यामुळे संबंधितांवर वाहतूक शाखा, पुणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडून कारवाई होणे गरजेचे आहे.
पाणवठे झाले दूषित सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे त्या परिसरातील विहिरीसह अन्य पाणवठ्यांचे पाणी दूषित होण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबत नागरिकांनी संबंधित विभागांकडे तक्रारी करून देखील योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
तातडीने दखल घेण्याची गरज सांडपाणी उघड्यावर सोडून त्याद्वारे दुर्गंधी व पाण्याचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीकडून अशा तक्रारींची तातडीने दखल घेण्याऐवजी दिरंगाई केली जात आहे. याशिवाय गावोगावी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे पाण्याचे नमुने तपासण्याची सोय उपलब्ध आहे.
पण आरोग्य विभागाचे कर्मचारी अशा ठिकाणी फिरकण्यास अथवा पाहणी करण्यास का टाळाटाळ करत आहे असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. पाणवठे दूषित करणाऱ्यांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे, अन्यथा पाण्याचा प्रश्न बनणार आहे.
महसूल, आरोग्य, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करून देखील सांडपाणी उघड्यावर सोडून पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.
सोमनाथ गावडे, ग्रामस्थ, वाडेबोल्हाई
हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाण्याचे दूषितीकरण होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही. याबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत सूचना करण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल.
संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद