स्मशानभूमीत काम करणाऱ्या राधाबाईंचा कोल्हेंनी केला सन्मान
शंकर दुपारगुडे
कोपरगाव – जनमाणसात वावरताना जिवंत माणसांची स्त्रियांना जास्त भीती वाटत आहे. स्मशानभूमीत राहात असूनही मला भीती वाटत नाही. उलट सुरक्षित आहे. पण बाहेरच्या जीवंत माणसांशी बोलताना व वावरताना कधी कोणाची नियत बदलेल, याची खात्री राहीली नाही. म्हणून मेलेल्या माणसांपेक्षा जिवंत माणसांची भीती वाटते, अशी प्रतिक्रिया स्मशानभूमीत काम करणाऱ्या राधाबाई जाधव यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यशी चर्चा करताना व्यक्त केली.
जागतिक महिलादिनानिमित्त कोपरगावच्या आमरधाम येथे सन 2001 पासून मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या राधाबाई जाधव या एका दुर्लक्ष महिलेचा सन्मान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला. यावेळी कोल्हे यांनी राधाबाई यांच्या दैनंदिन कामकाजासह कौटुंबिक माहीत आस्थेने केली. त्यावेळी राधाबाई जाधव यांची बोलकी प्रतिक्रिया सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
जनमाणसातील पुरुषी विकृती वाढली. महिलांवर होणारे आत्याचार, महिलांचा खून करणे, जीवंत जाळणे, लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांवर आत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशा घटना ऐकून बाहेरच्या जगापेक्षा स्मशान सुरक्षित आहे.
कोपरगावच्या स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या राधाबाई जाधव 2001 पासून कोपरगाव अमरधाम येथे काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास दोन हजार मृतदेहांना अग्निसंस्कार देण्याचे व अस्थी गोळा करण्याचे काम करून आपला प्रपंच चालविला. एक महिला असूनही रात्रंदिवस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होईपर्यंत रात्रभर व दिवसभर लक्ष ठेवून तिथेत राहायचे. हे कठीण काम श्रद्धापूर्वक राधाबाई करत असता. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दुःखात अशी सेवा करून त्या मदत करतात.
राधाबाई यांच्या पतीला अपघाती अपंगत्व आल्याने दोन मुलांसह कुटुंबाची जबाबदारी राधाबाईवर आल्याने ऐन तरुण्यात बाहेचे काम करण्यापेक्षा स्मशानभूमीत काम करणे त्यांना सुरक्षित वाटले.आत्तापर्यंत राधाबाई यांनी दोन हजारांपेक्षा ज्यात मृतदेहांवर अग्निसंस्कार व दफन विधीचे कम केले आहे. राधाबाई यांच्या धाडशी कामगिरीचा कोपरगाकरांना अभिमान आहे म्हणूनच विविध स्तरातून त्यांना सहकार्य मिळते. या जिद्दी महिलेचा महिला दिनानिमित्त माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्मशानभूमीत जाऊन सन्मान करीत आस्थेने विचारले की तुम्हाला स्मशानभूमीत काम करताना व राहताना भीती वाटत नाही का? यावर राधाबाईं यांची प्रतिक्रिया ऐकून कोल्हे या सुद्धा अवाक झाल्या.
कोल्हे म्हणाल्या, राधाबाईंची प्रतिक्रिया म्हणजे समाजाचे डोळे उघडणारी आहे. सध्या माणूस माणसाशी माणसासारखे वागत नाहीत. स्त्रियांवर सामूहिक आत्याचार करणे, त्यांना जिवंत जाळणे, अशा घटना वारंवार घडत आहेत. कोणालाही कोणाची भीती राहीली नाही. काही पुरुषी विकृतीने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. म्हणूनच राधाबाई सारख्या सामान्य महिला आज तिखट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. स्मशानभूमीत महिलांना सुरक्षित वाटण्यामागे पुरुषी विकृती जबाबदार आहेत, याची खंत वाटते. राधाबाई जाधव या धाडसी व पुण्याचे काम करत आहेत. आम्हा सर्व स्त्रियांना त्यांचा कार्याचा अभिमान आहे.
अन् कोल्हे यांना माय-लेकीने मारली मिठी
कोल्हे यांनी राधाबाई व त्यांची मुलगी पल्लवीचा सन्मान केला. तसेच पल्लवीच्या पुढील शिक्षणासह या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत आहे, असे म्हणताच राधाबाई व त्यांची मुलगी पल्लवी या भावनिक होऊन कोल्हे यांना मिठी मारून समाधान व्यक्त केले.