पुणे – नाटकाचे प्रयोग सुरू असताना वारंवार सूचना देऊनदेखील प्रेक्षकांचे मोबाइल सर्रास वाजतात. अनेकदा कलाकारांना यामुळे नाटक थांबवावे लागते. वारंवार कलाकारांनीदेखील याबाबत भाष्य केले आहे. मात्र, परिस्थिती “जैसे थे’च आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर मुंबई महापालिकेने नाट्यगृहांमध्ये “जॅमर’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातदेखील “जॅमर’ बसवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे आणि नाटकाचे अनोखे समीकरण आहे. येथील प्रेक्षक वर्ग “सुज्ञ’ समजला जातो. परंतु, वारंवार प्रेक्षकांचे मोबाइल वाजल्याने प्रयोग थांबवावे लागत आहेत. त्यामुळे मुंबईतील नाट्यगृहांप्रमाणे पुण्यातही “जॅमर’ बसवणे, ही स्वागतार्ह बाब असल्याची भावना नाट्य कलाकारांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
नाटक सुरू होण्यापूर्वी मोबाइल “सायलेंट मोड’वर किंवा “स्वीच्ड ऑफ’ ठेवण्याचे आवाहन केले जाते. मात्र, त्याकडे “कानाडोळा’ करतात. प्रयोगाच्या कालावधीमध्ये मोबाइल वाजल्याने प्रेक्षक घेत असलेल्या नाटकाच्या आस्वादावर आणि कलाकारांच्या मेहनतीवर “पडदा’ पडतो.
कलाकार सांगतात…
महाराष्ट्रातील सर्वच नाट्यगृहांमध्ये “जॅमर’ बसविणे गरजेचे आहे. नाट्यगृहातील 90 टक्के प्रेक्षक शांतपणे नाटकाचा आस्वाद घेतात. मात्र, 10 टक्के प्रेक्षकांमुळे त्रास सहन करावा लागतो. जॅमरबाबतीत प्रेक्षकांकडून “इमरजन्सी कॉल्स’चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. परंतु, काही वर्षांपूर्वी मोबाइल नव्हते, तेव्हा प्रेक्षक पर्याय शोधतच होते. नाट्यकलाकार प्रयोगावेळी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तीनतास भूमिकेमध्ये एकरुप होतो. मात्र, प्रेक्षक वारंवार मोबाइलमध्ये पाहत असतात.
– शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते
प्रेक्षकांना सगळ्या भाषांमध्ये सांगून त्यांच्यात कोणताही फरक पडत नाही. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगून मला कंटाळा आला. केवळ मुंबई-पुण्यापुरता हा विषय मर्यादित नसून संपूर्ण राज्यात हीच स्थिती आहे. त्यामुळे नाट्यगृहांमधील मोबाइलच्या वापराबाबत “नो कॉमेंटस’ असेच म्हणावे लागेल.
– सुबोध भावे, अभिनेते
नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांचे फोन सातत्याने वाजतात. या प्रकरणाबाबत नाट्यकलाकारांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार प्रेक्षकांना सांगूनदेखील त्यांच्यामध्ये समज येत नाही. त्यामुळे तांत्रिक मदत घेऊन उपाययोजना होणे, नक्कीच स्वागतार्ह आहे.
– सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते
प्रेक्षक सांगतात…
नाटक आणि चित्रपट यामध्ये खूप फरक असतो. नाटकात प्रत्यक्ष कलाकार आपल्या समोर असतात. महिनोंमहिने तालीम केलेल्या कलाकारांसमोर जोरात मोबाइल वाजणे किंवा नाटक सोडून मोबाइल पाहत बसणे म्हणजे त्या नाटकाचा आणि कलाकारांचा अपमान आहे. मुळामध्ये तिकीट काढून नाटकच पाहायला गेलो असताना मोबाइल हवाच कशाला.
– महेश आकोलकर
नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याचा निर्णय चांगला आहे. राज्यातील सर्वच नाट्यगृहांमध्ये याची अंमलबजावणी व्हायला हवी. आवश्यक त्या अटी आणि सूचना नियमित करून “जॅमर’ लावणे, ही कौतूकास्पद बाब आहे. या निर्णयामुळे नाट्य कलाकारांच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– प्रज्ज्वल खेडकर
मुंबईच्या धर्तीवर पुण्यातल्या नाट्यगृहांमध्ये “जॅमर’ लावलेच पाहिजेत. नाटक उभे करताना कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांची खूप मेहनत असते. नाटकाच्या सादरीकरणावेळी त्यांच्या प्रयत्नाचे चीज होत असते. अशातच ज्या प्रेक्षकांना “रसिक मायबाप’ म्हणतो, त्यांचे मोबाइल फोन वाजतात. काही प्रेक्षक नाट्यगृहातच प्रयोग सुरू असताना कलाकारांना गृहित धरून फोन उचलून कलाकारांच्या सादरीकरणात अडथळा आणतात.
– पराग वाघमारे