नवी दिल्ली – देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ ची उत्कंठा वाढली आहे. सत्ताधारी भाजपपासून सर्वच पक्ष आणि विरोधी पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकीच्या तारखांबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही तयार आहोत आणि सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निवडणूक आयोगाच्या वतीने मी सांगू इच्छितो की, आम्ही ओडिशाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि विधानसभा निवडणुका घेण्यास तयार आहोत. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
उल्लेखनीय आहे की, निवडणूक आयोग मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यात सात ते आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. मे महिन्यातच निवडणुकीचे निकालही येऊ शकतात. विद्यमान १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपत आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ९ टप्प्यात मतदान झाले होते, तर २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फक्त ७ टप्प्यात मतदान झाले होते. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था, संसाधनांची उपलब्धता आणि इतर अनेक बाबी लक्षात घेऊन निवडणुका किती टप्प्यांत घ्यायच्या याचा निर्णय आयोगाला घ्यावा लागणार आहे. सरकारला कमीतकमी टप्प्यात निवडणूक घ्यायची आहे, असे आजवर दिसून आले आहे.