नवी दिल्ली :– मेसेंजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने सप्टेंबर महिन्यात 26.85 लाख भारतीयांच्या अकाउंटवर बंदी घातली (WhatsApp Bans 26.85 Lakh Accounts In India In September) असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअॅप इंडियाने आपला मासिक अहवाल जारी केला असून त्यामध्ये ही माहिती दिली आहे. ही कारवाई नवीन माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021 च्या नियमानुसार व्हॉटसऍपने केली आहे.
ऑगस्टमध्ये बंदी घातलेल्या 23.28 लाख खात्यांपेक्षा सप्टेंबरमध्ये ब्लॉक केलेल्या खात्यांची संख्या 15 टक्क्यांनी जास्त आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 26 लाख 85 हजार व्हॉट्सअॅप खात्यांवर बंदी घालण्यात आली. यापैकी 8 लाख 72 हजार खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी बंद करण्यात आली.
व्हॉट्सअॅपच्या तक्रार आणि निवारण विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर या अकाउंटवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीकडे 666 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु केवळ 23 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
यूजर्सच्या सुरक्षा आणि गोपनियतेला प्राथमिकता देणे हा व्हॉट्सअॅपचा प्रमुख उद्देश असल्याचे कंपनीने आपल्या अहवालात म्हटले आहे. यातील मेसेंजिंग सिस्टमचा दुरुपयोग थांबवण्यासाठी एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड बनवण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपने भारतीय यूजर्सच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार आणि निवारण विभाग सुरू केला असून त्यामध्ये इंजिनिअर्स, टेक्निशियन, संशोधक, कायदेतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातले तज्ज्ञांचा समावेश आहे.