श्रीनगर – राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरात समारोप झाला. या यात्रेचे ठिकठिकाणी मोठे स्वागत झाले. त्यातून कॉंग्रेसची व राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारली असा निष्कर्ष बहुतेक जणांनी काढला आहे. परंतु त्यानंतर पुढे काय हा प्रश्न महत्वाचा आहे. या यात्रेच्या यशानंतरही कॉंग्रेसच्या पुढे अनेक मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांवर कॉंग्रेस कशी मात करणार हाच प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यावरच सन 2024च्या लोकसभा निवडणुकांमधील कॉंग्रेसचे यश अवलंबून असेल, असे मत राजकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचे संकट आहे आणि मतदारांमध्ये पुन्हा विश्वासार्हता मिळवण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या मरगळलेल्या संघटनेची पुनर्बांधणी करण्याचे कठीण काम या जुन्या पक्षाला करायचे आहे. सत्ताधारी भाजपच्या हिंदुत्व-प्रेरित आव्हानाचा मुकाबला करणारी राजकीय विश्वसनीयताही या पक्षाला तयार करायची आहे. या पक्षाने तशी बांधणी केली तरच या पक्षाला भविष्यात मोठी वाटचाल करता येईल. अन्यथा त्यांना केवळ भारत जोडो यात्रेच्या यशावर अवलंबून राहता येणार नाही, असेही अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे.
2024च्या राष्ट्रीय निवडणुकीच्या आधी नऊ राज्यांत विधानसभांच्या निवडणुका आहेत. त्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची कामगीरी कशी होईल यावरून त्यांचे लोकसभा निवडणुकीतील आव्हान मोजले जाणार आहे. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसपुढे चांगली कामगीरी करण्याचे आव्हान आहे. प्रथम त्यांना हे आव्हान पेलावे लागणार आहे.
राजकीय समालोचक संजय झा, जे एकेकाळी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते, ते म्हणाले की, भाजपचा मुकाबला करण्याचे खरे काम आता कॉंग्रेससाठी सुरू झाले आहे आणि पक्षाकडे त्याची क्षमता आहे. या यात्रेमुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते गॅल्वनाइज्ड झाले आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आक्रमक भाषणे करत आहेत, असे निरीक्षणही झा यांनी पीटीआयशी बोलताना नोंदवले आहे.
ते म्हणाले की, कॉंग्रेससाठी 2023मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका ही उपांत्य फेरी असणार आहे. त्यात त्यांना “करा किंवा मरा” अशीच भूमिका घ्यावी लागणार आहे. मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालॅंड, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या नऊ राज्यांमध्ये यंदा निवडणुका होत आहेत. पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या ईशान्येकडील चार राज्यांमधील निकाल कॉंग्रेसच्या बाजूने फारसे जाण्याची शक्यता नाही.
2018मध्ये कॉंग्रेसला मिझोराममध्ये दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. त्रिपुरा आणि नागालॅंडमध्येही कॉंग्रेससाठी आव्हानात्मक स्थिती आहे. परंतु, मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होणार असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने सत्ता मिळवल्यास ईशान्येतील निराशाजनक प्रदर्शनाची भरपाई होऊ शकते. बहुतेक राजकीय निरीक्षकांनी कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यात कॉंग्रेसला चांगली संधी असल्याचे म्हटले आहे.
राजस्थानात कॉंग्रेसने सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करून राजस्थानमधील अडथळे ताबडतोब सोडवण्याची गरज आहे. कॉंग्रेसने हारा-किरी करणे थांबवल्यास छत्तीसगड आणि मध्य प्रदेश दोन्ही जिंकता येतील, असे झा म्हणाले. तेलंगणा देखील महत्त्वपूर्ण आहे, पण तिथे कॉंग्रेसला कितपत संधी मिळेल, ते पाहावे लागेल.