“सिर सलामत तो पगडी पचास’ असं काहीसं वातावरण या करोना विषाणुमुळे आपणास पाहावयास मिळत आहे. औषधच नसलेल्या या विषाणूसाठी केवळ “लॉकडाउन’ हाच प्रतिबंधकात्मक उपाय ठरला. या हालाखीच्या परिस्थितीत आरोग्याला प्राधान्य दिले, तर येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करणे शक्य असेल. कोणतीही वेळ कायम स्वरूपाची नसतेच मुळी.
सध्या उद्भवलेली बिकट परिस्थिती आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे भारतीय, स्वाभिमानाने भारतीय संस्कृतीकडे परत वळाले. जागतिक स्तरावर सर्वत्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या विश्वात भारतीय संस्कृतीचे कौतुक झाले. जिमला जाणारे सूर्यनमस्कार व योगाकडे आकर्षित झाले. आलिंगन किंवा शेकहॅंड करणारे आता हात जोडून करण्यात येणाऱ्या नमस्काराला मान देऊ लागले. फूड सप्लिमेंट मेडिसिन्स पुन्हा आयुर्वेदाकडे वळाल्या.
करोडो रुपये देऊनही न मिळणाऱ्या ओझनवायूचे पृथ्वी भोवतालचे आवरण पूर्वरूप होत आहे. संध्याकाळी शॉपिंगला जाणाऱ्या आमच्या तरुण मुली पूजा, पाठ व त्यानंतर भारतीय पौष्टिक खाद्यपदार्थ बनवताय. जे करता येत नाही, ते आवडीने शिकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यसनांच्या आहारी गेलेले बहुतांश लोक व्यसन न करता करोनाच्या भीतीपोटी घरातच बसले आहेत. निसर्ग फुलतोय पण करोना त्याचा संसर्ग पसरवत आहे. या करोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता प्रशासकीय यंत्रणा युद्ध पातळीवर आपल्यासाठी झटत आहेत. याचे मान मात्र दुर्देवाने सर्वांना नाही. आता त्याचे भान ठेवूया. प्रशासनाला अन् पर्यायाने स्वत:लाच सहकार्य करू.
ज्योती सैदाने, नगर संपर्क: 9689520240.
फक्त आपलाच देश नव्हे तर अवघ जग करोनाला रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये आहे. यात उद्योजक, सेलेब्रिटी, नेते तसेच कायम जगभर भ्रमंती करणारे हरहुन्नरी लोकसुद्धा अडकले आहेत. ते घरातच थांबण्यात धन्यता मानत आहेत. कोणी बागकाम करीत आहे, कोणी छान छान पुस्तके वाचत आहे. अनेकजण परिवारासोबत वेळ घालवत आहेत.
मात्र, या काळातही अनेक लोक घरात बसलेल्यांच्या जीवनासाठी झटत आहेत. त्यांच्यासाठी काय करू शकतो, निस्वार्थपणे त्याचा कृतीपूर्ण आराखडा बनविला पाहिजे, असे मला वाटते. राज्य सरकार, जिल्हा व तालुकास्तरीय प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था गरजू लोकांची सेवा मनोभावे करीत आहेत. त्यांच्या पोटाचा प्रश्न तूर्त कमी व्हावा, म्हणून ते करत असलेले कष्ट नक्कीच कौतुकास्पद आहेत. त्याचे नक्कीच मनस्वी समाधानही आहे. लॉकडाउनमुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण, छोटे-मोठे अपघातांना आळा बसला आहे.
करोनाला आटकाव झाल्यानंतर जेव्हा जग पूर्ववत होईल, त्यावेळी याच नियमांचे पालन केल्यास वरील प्रमाणेच स्थिती आपल्याकडे राहिल. देशात सध्या सामजिक बांधिलकीचे व जातीय सलोख्याचे वातावरण समृध्द होण्यास या कालावधीत मदतच झाली. सर्वांनाच आपल्या दैनंदिन कृतीतून, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून, एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागून कायम असेच ठेवता येईल हा लॉकडाउनमधील अनुभवाने आपणास शिकवणी दिली, असं मला वाटत. जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक घटक अन् सफाई कर्मचाऱ्यांचे आपल्या जीवनातील महत्व देखील अधोरेखीत झाल. त्यांची अपार अन् अहोरात्र मेहनत व निस्वार्थ जनसेवा सर्वांच्याच कामी आली..
अन्वर सय्यद ,मानवाधिकार संघटना, नगर संपर्क: 9511838080