मुंबई: महाभारताची लढाई 18 दिवस चालली होती, पण आम्ही 21 दिवसांत करोना विरूद्धची लढाई जिंकू असे पंतप्रधान मोदी म्हणत होते पण आज शंभर दिवसांनंतरही करोनचा प्रसार सुरूच असून तो थांबण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत, अशी टिका शिवसेनेने केली आहे.
महाभारताच्या लढाई पेक्षा करोना विरूद्धची लढाई अधिक अवघड असल्याचे दिसत आहे. सन 2021 पर्यंत करोनावरील लस सापडेल असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे, त्यामुळे ही लढाई आता सन 2021 पर्यंत चालणार आहे असे दिसते आहे असेहीं यात नमूद करण्यात आले आहे.
करोनाग्रस्तांच्या संख्येच्या बाबतीत भारताचा आता जगात तिसरा क्रमांक लागला आहे ही चिंतेची बाब आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. देशात रोज 25 हजार करोनाग्रस्त आढळून येत असतील तर आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या देशासाठी ही स्थिती अधिक गंभीर आणि चिंताजनक आहे. करोनाच्या संख्येच्या बाबतीत आज आपण रशियाला मागे टाकले आहे. हे प्रमाण असेच सुरू राहिले तर जगात आपला पहिला क्रमांक लागू शकतो की काय अशी आज स्थिती आहे.
महाराष्ट्रातील करोनाच्या स्थितीविषयी भाष्य करताना शिवसेनेने म्हटले आहे की महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारले असले तरी काही भागात पुन्हा बिकट स्थिती निर्माण होत आहे. अनेक राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी करोनाग्रस्त होत असून ही स्थिती देशसाठी आणि राज्यासाठी भुषणावह नाही असेही त्यांनी म्हटले आहे.