बेंगळुरू – राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेने नेमका काय उद्देश साध्य केला आहे असा सवाल कर्नाटकातील एक मंत्री के सुधाकर यांनी उपस्थित केला आहे. भारत जोडो यात्रा कालच कर्नाटकमधील आपला प्रवास पुर्ण करून तेलंगणा मध्ये दाखल झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर त्यांनी हा सवाल केला आहे.
के सुधाकर हे तीन वर्षापुर्वीच कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ही पदयात्रा म्हणजे समाजात फूट पाडण्याची चूक मान्य करण्याचाच आत्मसाक्षात्कार आहे. जात आणि धर्मात कॉंग्रेसनेच फूट पाडली आहे असे त्यांनी म्हटले आहे. फोडा आणि राज्य करा याच पद्धतीचे राजकारण कॉंग्रेसने केले असून त्या खेरीज या यात्रेचा अन्य कोणता हेतु साध्य झाला आहे काय असा प्रश्न सुधाकर यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भारताचे आणि देशाला अग्रस्थानी ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे संपूर्ण जग कौतुक करत असताना, कॉंग्रेस मात्र भारत जोडो नावाच्या भ्रमाच्या मार्गावर चालण्यात व्यस्त आहे असे त्यांनी म्हटले आहे. के सुधाकर हे कर्नाटकचे आरोग्य मंत्री आहेत.