मुंबई – कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकरी आणि व्यापऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे की, लोकांनी दोन चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय फरक पडतो. दहा लाख रूपयांच्या गाड्या वापरणाऱ्यांना 10 किंवा 20 रूपये जादा दराने कांदा खरेदी केला तर काय होणार आहे, असेही भुसे यांनी म्हटले आहे.
तथापि केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय योग्य समन्वयाने घ्यायला हवा होता असा अभिप्रायही त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचा पुरवठा सुधारण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले आहे.
मंत्री भुसे म्हणाले की, कधी कांद्याला 200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो, तर काही वेळा 2000 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतो.त्याच्या भावात चढउतार होतच असतात. तथापि निर्यात शुल्क लावण्याच्या निर्णयावर चर्चा होऊन त्यावर समाधानकारक तोडगा निघू शकतो, असे भुसे म्हणाले. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने कांद्याच्या निर्यातीला आळा बसेल त्यातून देशात कांद्याचे भाव गडगडणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कांद्याचे सौदे थांबवले आहेत.