पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – पवारसाहेबांवर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने अर्ज दाखल केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे.
मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहील, याची मला खात्री आहे.- सुप्रिया सुळे
जनताच इंजेक्शन देईल…
ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहन मतदारांना केले जात आहे. त्यामुळे आता जनतेनेच ते पुन्हा येणार नाहीत, हे लक्षात घेऊन भविष्यातील धोका ओळखावा. सर्वसामान्य जनता, शेतकरी, बेरोजगार मोदी सरकारच्या कारभाराने त्रस्त असून, मी डाॅक़्टर असलो तरी आता जनताच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला इंजेक्शन देईल हे नक्की आहे. – डॉ. अमोल कोल्हे
माझ्यासाठी नव्या पर्वाचा प्रारंभ…
या नव्या पर्वाचा प्रारंभ करत आज मी महायुतीच्या वतीने माझा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. गेला दीड महिना सहा विधानसभा मतदारसंघांतील नऊ तालुक्यांत संपर्क साधताना लोकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद, आपलेपणाने केलेले स्वागत, भरभरून दिलेले आशीर्वाद, याच पाठबळावर मी या नव्या पर्वाला सामोरी जात आहे. भल्या मोठ्या मतदारसंघाच्या सेवेचे आव्हान स्वीकारत आहे. – सुनेत्रा पवार
येणारा काळ हा धंगेकरांचा असेल…
काँग्रेस पक्षाकडून मला संधी देण्यात आली, मी पक्षाचा आभारी आहे. ही लढाई संविधान वाचविण्याची आहे. त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करून दाखविणार आहे, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे आपणा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभारी असून, लढण्यासाठी सज्ज आहे. येणारा काळ हा धंगेकरांचा असेल हे निश्चित.- रवींद्र धंगेकर