पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पेट्रोल, गॅस यांची दरवाढ कमी करणार आणि दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नाही, अशा सत्ताधाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का, असा सवाल राष्ट्रवादी कॉंंग्रेसच्या शरद्चंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी विचारला.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंंग्रेसच्या शरद्चंद्र गटाचे बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे, याच गटाचे शिरूर येथील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गुरूवारी आपले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यांच्या हातात सध्या देशाची सत्ता आहे त्यांनी महागाई, महिलांवरील अत्याचार यांसह अनेक गोष्टींबाबत आश्वासने दिली होती, मात्र ती पूर्ण केली नाहीत. नरेंद्र मोदी जेव्हा २०१४ मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की, ५० दिवसांत पेट्रोलचे दर कमी होतील, परंतु आज तीन हजार ६५० दिवस झाले तरी ते कमी न होता उलट ७० रुपयांवरून १०६ रुपये लिटर झाले आहे.
घरगुती गॅसचे दर एका सिलिंडर मागे ४१० रुपयांवरून १,१६० रुपयांवर गेले आहेत हे आश्वासन त्यांनी पाळले नाही. दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ हे देखील आश्वासन मोदींनी दिले होते, परंतु, नोकऱ्या मिळण्याऐवजी दोन कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत, अशी टीका पवार यांनी केली.
उमेदवार बसले व्यासपीठासमोर…
महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि डॉ. अमोल कोल्हे हे आणि त्यांचे कार्यकर्ते व्यासपीठाच्या समोर खाली जमीनीवर बसले. व्यासपीठावर जागा करून त्यांना पदाधिकाऱ्यांनी बोलावले मात्र त्यांनी व्यासपीठावर बसण्याला नकार देत तेथेचे व्यासपीठासमोर जमीनीवर बसून सर्व मान्यवरांची भाषण एकली.