पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या १८ वर्षांपासून डॉ. कोल्हे आम्ही एकत्र काम करत आहोत. तेव्हा आमच्यावर कधीच वैयक्तिक टीका केली गेली नाही; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून ती केली जात आहे. आम्ही सगळे एकत्र असताना आमचे काम चांगले होते आणि आता अचानक टीका होऊ लागली आहे, असा आरोप बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बारामती येथील उमेदवार सुप्रिया सुळे, याच गटाचे शिरूर येथील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुणे शहरचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर महाविकास आघाडीतर्फे सर्व मित्रपक्षांच्या सभेचे आयोजन केले होते.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे, सचिन अहिर, अन्य सर्व सहयोगी पक्षांतील अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
आमच्या पक्षाचे काम करायचे नाही, यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना धमक्या येत आहेत. हे कार्यकर्ते आम्हाला फोन करून दबक्या आवाजात ते सांगतात. कोण धमक्या देतात, हे आम्ही विचारले नाही; पण अशी धमकी आली तर आम्हाला सांगा. आम्ही संसदेत धमकी देणाऱ्यांना न घाबरता त्यांच्यासमोरच ठामपणे बोलतो, असे सुळे म्हणाल्या.
आजपर्यंत दूध संघ, जिल्हा बँक, साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये कधीच मी लक्ष घातले नाही. मी लहान असल्याने ते मोठे पडतात. आपण त्यात लक्ष घालायला नको, असा विचार करत होते. मात्र, आता विधानसभा निवडणूक झाली की, पंचायत समिती, ग्रामपंचायत, दूध संघ, सगळे कारखाने, बँका या सगळ्यांत आता मी लक्ष घालणार आणि महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे सुळे म्हणाल्या.
संसदपटू म्हणून मिळालेल्या सन्मानावर टीका केली जाते. माझा संसदेतील कार्य अहवाल मी त्यांना पाठवणार आहे. त्यांनी कितीही खालच्या दर्जाची टीका केली, तरी आम्ही पातळी सोडणार नाही. आमची लढाई कोणा व्यक्तीविरुद्ध नाही, तर अदृश्य शक्तीविरोधात आहे. त्यांनी सगळे मराठी माणसांचे पक्ष फोडले आहेत. ही निवडणूक आता आमच्या हातात राहिली नाही, ती जनतेच्या हातात गेली आहे.
सात मे चे बारामतीचे मतदान संपल्यावर आठ मे पासून आम्ही पुण्यातच मुक्कामी राहणार आहोत, असे सुळे म्हणाल्या. मी शारदाबाई पवारांची नात आहे, तिने आम्हाला रडायला नव्हे, तर लढायला शिकवले आहे, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, सचिन अहिर, मोहन जोशी यांचेही भाषण झाले.
जयंत पाटील म्हणाले…
आम्हाला सभेला जागाही चुकीची दिली आहे. तीनपेक्षा जास्त पक्षांचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांचा दृष्टिकोन अन्यायकारक आहे. हरकत नाही. दिवस बदलत असतात, हे लक्षात ठेवा. संसदरत्नांची मापे काढली जात आहेत. विरोधकांचा बोलण्याचा बॅलन्स जात आहे. जीएसटीच्या नावाखाली लूट केली जात आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या…
या निवडणुकीत महिलांना टार्गेट केले जात आहे. आम्ही महिला पॉलिटिकल टूल नाहीत. दोन वाघांच्या लढाईत कुत्र्यांचा फायदा होत आहे. दोन वाघ एकत्र झाले, तर कुत्र्यांचाही हिशेब होईल. जेवढा मोठा घोटाळा करणार, तेवढी पक्षात जोरदार एन्ट्री देणार, अशी विरोधकांची नीती आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले….
या निवडणुकीत देशाच्या धोरणावर बोलले जात नाही, तर पराभव दिसत असल्यामुळे वैयक्तिक टीका केली जात आहे. नटसम्राट असे बोलले जात आहे; पण नटसम्राट, कार्यसम्राट परवडले; परंतु खोकेसम्राट, धोकेसम्राट नको.