ग्वाल्हेर – तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ( West Bengal Lok Sabha 2024) सर्व ४२ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असतानाही, काँग्रेसने रविवारी म्हटले आहे की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीसोबत युती करण्याचे आमचे दरवाजे अद्याप खुले आहेत.
पटना येथे विरोधकांच्या रॅलीच्या आधी, काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी पीटीआयला सांगितले की, ते अजूनही आशावादी आहेत. आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असलो तरी इंडिया आघाडीतच आहोत असा निर्धार ममतांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्या भाजपला पराभूत करण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे आमची त्यांच्याशी पुन्हा आघाडीची इच्छा आहे असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
रमेश म्हणाले की, आम्ही कोणतेही दरवाजे बंद केलेले नाहीत. त्यांनी सर्व ४२ जागा लढवण्याची एकतर्फी घोषणा केली आहे. पण आमची अजूनही त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.
आज पाटण्यात समस्त विरोधकांची एक मोठी रॅली होत आहे. राजकीय बदलाचा निर्धार व्यक्त करण्यासाठी होत असलेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांनीही भारत जोडो न्याय यात्रे’ला एक दिवसाचा ब्रेक दिला आहे, असे ते म्हणाले. मध्यप्रदेश दौऱ्याच्या पाचव्या दिवशी राहुल गांधी उज्जैनमध्ये असतील आणि पवित्र श्री महाकालेश्वर मंदिराला भेट देतील, असे ते म्हणाले.