– प्रतिनिधी
विटा इथे चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ ग्रामीण साहित्य संमेलन भरवणारे रघुराज मेटकरी हे साहित्य वर्तुळातलं सुपरिचित आणि सर्वपरिचित नाव आहे. प्रस्तावना, मनोगत यांचा अभाव असलेलं मी बघितलेलं हे पहिलं पुस्तक. एक काळ असा होता की रसिक प्रस्तावना कोणाची आहे हे बघून पुस्तक खरेदी करत. साहित्यकृतींचे पुरस्कार निवडणाऱ्या परीक्षकांना देखील प्रस्तावना आणि प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखकांचं नाव प्रभावित करायचं. पण ते दिवस आता मागे पडले आहेत.
प्रस्तावना म्हणजे पुस्तकाची छोटी सावली… पुस्तकाचं सार. या साहित्यकृतीत स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग नोंदवलेल्या, स्वातंत्र्यलढ्याची झळ सोसलेल्या, स्वातंत्र्यलढा तीव्र करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सोळा व्यक्तिरेखांचा समावेश आहे. ही सगळीच प्रकरणे 12 ते 20 पानांची आहेत. हलकीफुलकी भाषा, सहज सुलभ लेखन शैली, प्रसंगांची आटोपशीर मांडणी यामुळेच हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे.
मनोगत लिहिताना लेखकाने सदर पुस्तक लिहिताना कोणत्या भूमिकेतून लिहिलं? साहित्यकृती लिहिण्यामागील त्याचा हेतू काय? याविषयी भाष्य करणे अपेक्षित असतं. परंतु स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तिरेखांचा धांडोळा घेणारी साहित्यकृती मांडताना त्या व्यक्तिरेखांच्या व्यक्तिमत्त्वातील आदर्शवाद समाजासमोर मांडणे, त्यांच्या कर्तृत्वाला उजळा देणे यापेक्षा दुसरा कोणता हेतू असणार..! पुस्तकाचे शीर्षकच खूप काही सांगून जाते आणि त्यामुळेच लेखकाला मनोगत लिहिण्याची गरज वाटली नसावी.
एखादा अपवाद वगळता या पुस्तकातील जवळजवळ सगळेच स्वातंत्र्यसेनानी हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यावरूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याची व्याप्ती किती मोठी असावी हे लक्षात येते. भारताचे स्वातंत्र्य हे कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी नसून तो देशव्यापी लढा होता. या लढ्यात शेतकरी, कामगार, मजूर, हमाल, स्त्री, पुरुष अशा सर्व वर्गातील व्यक्तिमत्त्वांनी सहभाग नोंदवला. पुस्तकात समावेश असलेल्या अनेक सेनानींपैकी हुतात्मा भाई कोतवाल इंग्रजाविरोधातील चकमकीत मारले गेले.
हुतात्मा किसनराव टेके इंग्रज धार्जिण्या असलेल्या नबाबाच्या रझाकारांकडून मारले गेले तर त्यांच्या पत्नी गोदावरी टेके आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेत असताना, रझाकारांवर गोळीबार करताना रझाकारांनी पेटवून दिलेल्या बंद वाड्यात जळून खाक झाल्या. या दोन व्यक्तिरेखा वगळता या पुस्तकातील इतर सर्व स्वातंत्र्यसैनिकांना दीर्घायुष्य लाभले. अनेकजण पुढे राजकारणात आले.
आमदार, खासदार, मंत्री झाले; परंतु या सर्वांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ देताना प्रचंड हालअपेष्टा सोसल्या हे कदापि विसरता येणार नाही. या सगळ्या व्यक्तिरेखांचा स्वातंत्र्यलढा वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात, उर अभिमानाने भरून येतो. एकुणात ही सगळीच व्यक्तिचित्रे अत्यंत प्रेरणादायी झाली आहेत.
प्रकाशक : आदित्य प्रकाशन पाने : 236 मूल्य : 350 रुपये