मुंबई – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती झाली आहे. ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अद्यापही काही भागात ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याचे दिसते. यातच आता हवामान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या गुरुवारपासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे.
गुरूवारपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.
मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. मात्र आजपासून पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. तर गुरुवारपासून राज्याच्या काही भागात पुन्हा पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर मुंबईसह ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागात आज आणि उद्या हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज आहे.