जालना : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नकरत आहे पंरतु, मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाचा ठराव पारित केल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र, जोपर्यंत हातात प्रमाणपत्र पडत नाही, तोपर्यंत मी हटणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.
उपोषणाविषयीची भूमिका मांडताना, “आम्ही उपोषण मागे घेतलेलं नाही. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आंदोलन थांबणार नाही. फक्त त्यांच्या ठरावात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही दुपारी बैठक घेत आहोत. महाराष्ट्रातल्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचं कारण नाही. आपलं सगळं समाजासमोर पारदर्शी आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले. तर दुसरीकडे सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरावली गावात दाखल झाले आहे.
त्यासोबतच त्यांनी, “काल त्यांनी काय चर्चा केली ते मला बघायचं आहे. स्वातंत्र्यापासून एकतर सगळे पक्ष या मुद्द्यावर एकत्र येत नव्हते. आता आलेत तर आपणही थोडं सकारात्मक बोललं पाहिजे. विरोध करताना दणकून विरोध केला आपण. बघुयात त्यांचा काय ठराव आहे. मी जर त्यांचे तीन जीआर परत पाठवू शकतो, तर मग ठरावावर मी ऐकणार आहे का? आता महाराष्ट्रातला मराठा हुशार आहे. पक्कं काही बघितल्याशिवाय माघारी जात नाही आता”, असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.
“मला ठराव बघायचा आहे. मला व समाजाला पटला तर आम्ही दोन वाजता बघू काय निर्णय घ्यायचा. पण निर्णय समाजाच्या हिताचा असेल, आंदोलन मागे घेणार नाही. ज्या दिवशी समाजाच्या हातात आरक्षणाचं प्रमाणपत्र पडेल, त्या दिवशी मी आरक्षण मागे घेईन. तोपर्यंत नाही. मी ताणून धरलं आहे. महाराष्ट्रानं बेफिकीर घरी झोपून राहायचं. हा रात्रीतून बंद करून जाईल वगैरे घाबरण्याचं कारण नाही. अजिबात जात नाही मी. तुमच्या हातात प्रमाणपत्र पडेपर्यंत मी हटत नाही. मग यांनी कितीही बैठका घेऊ द्या, कितीही ठराव करू द्या”, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले.