Weather Update : देशातील पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हे उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने आल्याने राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. शनिवारी विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. धुळ्यात पारा ८.८ अंशांवर असल्याने तीव्र थंडी कायम आहे. तर राज्यात नाताळनंतर काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुन्हा तापमानात घट होईल. त्यामुळे नाताळानंतर थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आग्नेय दिशेकडून उष्ण वारे वाहून येत आहेत. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात ईशान्य दिशेकडून वारे वाहत आहेत. उत्तरेतील अतिशीत वारे आणि बाष्पही वाहून येत आहेत. त्यामुळे आकाशात अंशत: ढग घोंगावतील. परिणामी डिसेंबर अखेर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वसामान्य थंडी आणि विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
रब्बी हंगामातील पिकांना फायदा
डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत नव्हता, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे. तापमानात घट झाल्याने पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
लहान दिवस, लवकर अंधार
२१ डिसेंबर ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस होता. सायंकाळी ५.५५ वाजताच सूर्य मावळून अंधार पडला होता.