मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे सक्षमीकरण आणि त्यांचा कौशल्य विकास होईल, त्या माध्यमातून राज्यात कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीच्या चळवळीला मोठी गती प्राप्त होईल. सर्वांच्या सहभागातून या विद्यापीठाला आदर्श विद्यापीठ बनवू, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आज एलफिस्टन टेक्निकल महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (इइन्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनानेही कौशल्य विकासाच्या कामात चांगली आघाडी घेतली आहे. कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आता युवकांसाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे विद्यापीठ राज्यातील कौशल्य विकासाच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे. रॉबर्टस् यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागात 1 हजार कौशल्य केंद्र सुरु करणार
राज्यात विशेषत: शहरी भागात केंद्रीत झालेली कौशल्य विकासाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी येत्या सहा महिन्यात राज्यातील ग्रामीण भागात एक हजार कौशल्य केंद्र सुरु करण्यात येतील, अशी घोषणा यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. विद्यापाठातील अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत शिकविण्यात येतील. राज्यात येत्या वर्षभरात 5 लाख युवकांना रोजगार देण्यात येईल. त्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत व्यापक कार्यवाही करण्यात येत असल्याचे लोढा यांनी सांगितले.