पालघर – “आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, एका जाहिरातीमुळे काही होईल एवढी शिंदे गट व भाजपची युती तकलादू नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. पालघरमध्ये “शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिंदे गट व भाजप यांच्यात जाहिरातीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे फडणवीस प्रचंड नाराज असून युतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. अशात आज पालघरमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येत होत असलेल्या चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम दिला.
गुरुवारी मुंबईहून शिंदे व फडणवीस हे हेलिकॉप्टरने एकत्र पालघरला आले. याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, मी हेलिकॉप्टरने पालघरला उतरलो तेव्हा मला पत्रकारांनी विचारले शिंदेंसोबत प्रवास करून कसे वाटत आहे. त्यावर मी म्हणालो, आमचा एकत्र प्रवास आताचा नव्हे तर गेल्या 25 वर्षांपासूनचा आहे. गेल्या वर्षभरात आमचा प्रवास आणखी घट्ट झाला आहे.
त्यामुळे आमच्या प्रवासची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. तसेच, पहिले भाषण कुणी करायचे, यावरून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही नाही. एखादे पद मिळवण्यासाठी, वैयक्तिक लाभ मिळवण्यासाठी आम्ही सरकार स्थापन केलेले नाही. तर, सर्वसामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदल व्हावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.
शिंदे हे लोकप्रिय मुख्यमंत्री
विशेष म्हणजे आपल्या भाषणात फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून केला. शिंदेसेनेने दिलेल्या जाहिरातीत शिंदे हे फडणवीसांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा उल्लेख होता. त्यामुळेच शिंदे गट व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे आज भाषणात फडणवीसांनीच शिंदेंचा “लोकप्रिय’ असा उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
तसेच यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावाला. ते म्हणाले, वर्षभरापूर्वी राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आले. तेव्हापासून सरकार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. अन्यथा पूर्वी “सरकार आपल्या घरी’, अशी स्थिती होती. हे दोन सरकारमधील अंतर आहे.
कार मात्र वेगवेगळी
गुरुवारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे जाहिरात वादानंतर प्रथमच हेलिकॉप्टरमध्ये एकत्र आले. मात्र, पालघरमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या कारने कार्यक्रमस्थळाचा रस्ता धरला. विशेष म्हणजे शिंदे यांनी फडणवीसांना सोबत कारने जाण्याची विनंती केली.
मात्र, फडणवीसांनी याला नकार दिला. यापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये फडणवीस-शिंदे यांनी एकाच कारने प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे. फडणवीस हे नेहमी खिलाडू वृत्तीने शिंदेंचे सारथ्य करताना दिसतात. ही खिलाडू वृत्ती पालघरमध्ये मात्र दिसून आली नाही.