नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांनी न्यायव्यवस्थेकडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. न्यायाव्यवस्था ही प्रगतशील समाजाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते. जरी जनता न्यायाधिशांची निवड करत नसली तरी त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते,’ अशी स्पष्ट भूमिका डी. वाय. चंद्रचूड यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन यूनिव्हर्सिटी लॉ सेंटर आणि दिल्लीतील सोसायटी फॉर डेमोक्रेटिक राइट्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले की, “न्यायाधीशांची भूमिका खूप महत्त्वाची असते, जरी निवडून येत नसलो. दर पाच वर्षांनी लोकांकडे मत मागायला आम्ही जात नाही. यामागे एक कारण आहे. मला विश्वास आहे की तंत्रज्ञानाने झपाट्याने बदलत असलेल्या युगात न्यायव्यवस्था ही आपल्या समाजाच्या विकासावर स्थिर प्रभाव टाकणारी आहे,” असे चंद्रचूड म्हणाले.
यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयातील बहुमतांबाबत भाष्य केलं. “जगभरातील अनेक समाजांमध्ये कायद्याने हिंसेची जागा घेतली आहे. अनेक प्रकरणांमध्ये आम्ही निर्णय घेतो. ज्यामध्ये आताच्या समलैंगिक विवाहच्या प्रकरणाचाही समावेश आहे. माझ्यामते निकालांचा परिणाम अधिक महत्त्वाचा असतो मात्र प्रक्रिया सुद्धा परिणामां इतकीच महत्त्वाची असते, न्यायालयांचा उद्देश हा व्यापक समानता मिळवण्याचा असून हे समानतेच्या अधिकारांविरोधात नाही” असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “लोक केवळ निर्णयासाठी कोर्टात जात नाहीत. घटनात्मक बदलांसाठीही अनेक जण कोर्टात धाव घेतात. न्यायालयांसाठी हे महत्त्वाचे आहे. न्यायालयेही सरकारच्या अनेक संस्थांपैकी एक आहेत. प्रत्येकामध्ये अधिकारांचे वितरण आहे. आम्ही विधिमंडळाच्या कामकाजात किंवा कार्यकारिणीच्या कामकाजात हस्तक्षेप करत नाही. या सर्वांमध्ये वेगवेगळे हक्क वाटून देण्यात आले आहेत. न्यायाधिशांमध्ये न्यायालयांमध्ये दिलेल्या आदेशांद्वारे समाजात स्थिर प्रभाव निर्माण करण्याची क्षमता असते. न्यायालयं सुद्धा इतर सरकारी संस्थांसारखेच काम करतात.”