मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
त्यांच्या या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले व अशोक चव्हाण यांनी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त आहे. यावेळी फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, ‘हा त्यांच्या पक्षातील निर्णय आहे. योग्य वेळी आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ. पण हा त्यांच्या वैयक्तीक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हा अंतर्गत विषय आहे. यावर अजून चर्चा सुरु आहे. याबाबत आम्हाला काहीही माहित नाही. आत्ता यावर बोलणं प्रीमॅच्युअर राहील. त्यामुळे मी यावर आत्ता बोलणार नाही. आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत..’ योग्य वेळी आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे ते म्हणाले आहेत.
‘पहाटेच्या शपथ विधीला माझे समर्थन नव्हते…’ – शरद पवार
पहाटेच्या शपथविधीला माझे अजिबात समर्थन नव्हते. तो मोठा धक्का होता. ‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं, असे शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. यावर आता उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे. ‘शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहले ते मला माहित नाही. पण त्या एपिसोडवर मी योग्यवेळी पुस्तक लिहिणारयं’, असे त्यांनी सांगितले आहे.