चंद्रपूर: राज्यात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडातील नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेत नाही. सहा महिन्यांतच कधी कॉंग्रेस, तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील नाराजी ठाकरे सरकारसाठी आता दररोजची डोकेदुखी ठरू लागली आहे. आता पुन्हा एकदा कॉंग्रेस आमदाराने आमचा मान राखला जात नाही. शिवाय कॉंग्रेस आमदारांची कामे रखडली जात असल्याची नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आमदार यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. या दरम्यान आमदार महोदयांनी ही तक्रार केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. तसेच मान राखला जात नसल्याची तक्रार धोटे यांनी केली आहे. तसेच कामे होणार नसतील तर लोकांना काय तोंड देणार, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
तसेच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून काम रोखल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला. याबाबत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश द्यावे, अशी विनंती यावेळी धोटे यांनी केली.