स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रशासनाकडे मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- इचलकरंजी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून येथील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने आरोग्य सुविधा पुरवाव्यात तसेच खासगी दवाखाने त्वरीत सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. इचलकरंजी येथे वाढलेल्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रातांधिकारी विकास खरात यांची भेट घेऊन चर्चा केली.
तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर व आयजीएम चे वैद्यकीय अधिष्ठाता रविंद्रकुमार शेट्ये यांचीही भेट घेऊन उपाययोजना संदर्भात चर्चा केली.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, सध्या शहरामध्ये प्रशासनाकडे 700 रूग्णांच्या बेडची सोय असून झपाट्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. पॉझिटीव्ह रूग्णांवर योग्य ते उपचार होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली पाहिजे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी इचलकरंजी मधील परिस्थितीबाबत चर्चा करून ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन अथवा शहर व परिसरातील हॉटेल्स ताब्यात घेऊन होम कन्सलंटिग सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात. शहरातील बहुतांश खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे इतर रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सदर डॉक्टरांना तातडीने सेवा करण्या संदर्भात प्रशासनाने आदेश काढावेत. जेणेकरून इतर रूग्णांना वेळेत उपचार मिळतील अशी मागणीही यावेळी केली.