कोलकाता – देशाला करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. विषाणूची पहिली लाट ओसरल्यानंतर, आपण करोनावर मात केल्याच्या अविर्भावात शासन पातळीवर घेण्यात आलेले निर्णय व त्याला नागरिकांच्या बेफिकिरीची मिळालेली साथ यांमुळे करोना चांगलाच फोफावला.
लॉकडाउन सारखे सामान्यांचे कंबरडे मोडणारे निर्बंध लादून पहिल्या लाटेतील विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यात यश मिळालं खरं. मात्र, त्यानंतरच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे ते अबाधित राखता आलं नाही.
करोना विषाणू धोकादायक ठरत असल्याचे दिसताच राज्यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंधाच्या नावाखाली लॉकडाउन केले. यामुळे आता रुग्णसंख्या ओसरत असल्याचे दिसत असले तरी अनेक राज्य मागचा अनुभव गाठीशी असल्याने हे निर्बंध शिथिल करण्यास धास्तावत असल्याचंच दिसतंय.
अशातच आज, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील लॉकडाउन १५ जूनपर्यंत वाढवत असल्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे राज्यात यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध आता १५ जूनपर्यंत अबाधित राहणार आहेत.
तत्पूर्वी, पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. राज्यात निवडणूक प्रचारसभांमध्ये जमलेली गर्दी पाहता येथे करोना चिरडून मेला असेल अशी उपहासात्मक टीका समाजमाध्यमांद्वारे केली जात होती. मात्र निवडणुकांनंतर येथील बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर येतंय.
West Bengal Govt extends statewide restrictions till June 15th to curb #COVID19 in the state: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/rdwGsEsrca
— ANI (@ANI) May 27, 2021