कामशेत (वार्ताहर) – उन्हाळा सुरू झाल्याने जशी जळ माणसाला बसते तशीच ती पशुपक्षांनाही बसते. पशुपक्षी आणि भटक्या प्राण्यांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन कामशेत येथील सह्यादी विद्यार्थी अकादमी यांच्यावतीने शहरात विविध ठिकाणी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाणपोईची सोय केली. या उपक्रमात शहरातील नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या वेळी सह्यादी अकादमीचे अनिश शर्मा, निखिलेश दौंडे, निलेश गोडे, चेतन वाघमारे, केदार डाकवे, सचिन शेडगे, तुषार जैन, किशोर वाघमारे, अमित शिंदे आदी जण उपस्थित होते.
पुढील दोन महिने पशु-पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शहरातील विविध झाडांना तसेच कट्ट्यांवर एका मोठ्या भांड्यात पाण्याची सोय केली आहे. भावी पिढीतही वन्य प्राण्यांविषयी सामाजिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. पाण्याचे तळेही सुकल्याने पशु-पक्षी तसेच भटक्या प्राण्यांवर पाण्यासाठद दाहीदिशा वणवण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
अकादमीच्या पुढाकाराने पक्ष्यांना पाणी व दाणे यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. एप्रिल व मे असे दोन महिने मोठया प्रमाणात उष्णता वाढत असते. या कालावधीत पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. त्यामुळे ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर शहरातील काही ठिकाणी ही पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत. तरी नागरिकांना पाण्याची भांडी हवी असल्यास त्यांनी अकादमीशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन महिने ही मोहीम सुरू राहणार आहे.
वातावरणातील जास्त तापमान शरीर सहन करु शकत नाही. वन्य प्राणी तसेच पशु पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे. कितीही उन्हाळा असला तरी मनुष्य स्वत:साठी पाण्याची सोय करू शकतो. वन्य पशु पक्ष्यांना पाणवठे कोरडे पडल्यानंतर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. यामुळे ते शहराकडे धाव घेतात.
पक्षांसाठी धान्यही
भटकी कुत्री किंवा इतर जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र उन्हाळ्यात पक्षांना अन्न–पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यामुळे पक्षांसाठी धान्याचीही सोय करण्यात आली आहे.