पाथर्डी – तालुक्याच्या पूर्व भागातील खरवंडी कासार, फुंदे टाकळी, अकोला, मोहोज देवढे आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा तहानलेल्या गावासाठी सोपास्कारात न अडकता त्वरित पाणीपुरवठा करण्याची मागणी राजेंद्र देवढे यांनी केली.
याबाबत, तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात देवढे यांनी म्हटले आहे की, सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.अशा तापमानात पाण्यासाठी भटकंती करताना, महिलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर झाले असून यथावकाश ते आपल्या कार्यालयास सादर होतील. तेथून पुढे त्यांचा प्रवास पाहता यातच पंधरवडा उलटून जाईल. त्यामुळे सोपस्कारामध्ये न अडकता अपवादात्मक परिस्थितीनुसार निर्णय घेऊन तहानलेल्या गावांना त्वरित पाणीपुरवठा व्हावा,अशी मागणी देवढे यांनी केली आहे.
पाण्यासाठी महिलांची भटकंती
तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी भगवानगड पाणीयोजना मंजूर झाली असली तरी सध्या अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे लोकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे. अशा तापमानात अनेक गावांतील महिला पाण्यासाठी वणवण फिरताना दिसून येत आहेत.