वॉर्डांमध्ये बसवलेले वॉटर एटीएम गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत
पुणे – नागरिकांना पिण्यासाठी शुद्धपाणी उपलब्ध व्हावे यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे वॉर्डांमध्ये वॉटर एटीएम बसविले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून ते बंद असून, त्यामुळे योजनेवरच पाणी फिरल्याची स्थिती उद्भवली आहे.
लष्कर परिसरातील नागरिकांना रास्त दरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या माध्यमातून (सीएसआर) बोर्डाच्या आठही वॉर्डमध्ये वॉटर एटीएम बसविले आहे. या योजनेला 2016 साली प्रारंभ झाला. सद्यस्थितीत लष्कर परिसरात सुमारे दहा एटीएम बसवले आहेत. यामध्ये घोरपडी बाजार, वानवडी बाजार, आर. एस. केदारी रस्ता, कॅन्टोन्मेंट प्रशासकीय इमारत या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, अवघ्या दोन वर्षांतच बोर्डाच्या या पेयजल योजनेला घरघर लागली असून, बोर्डातील जवळपास सर्वच वॉटर एटीम बंद अवस्थेत आहेत.
जे. जे. गार्डन परिसरात दोन-तीन वर्षांपूर्वी वॉटर एटीएम बसवले होते. यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक, कामगार यांना याचा फायदा होत होता. पिण्यासाठी शुद्धपाणी उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून त्याचा वापरदेखील होत होता. मात्र, गेल्या एक वर्षापासून हे एटीएम बंद अवस्थेत आहेत, असे स्थानिक व्यावसायिक मारूती कांबळे यांनी सांगितले.
घोरपडी बाजार येथे साधारण दोन वर्षांपूर्वी वॉटर एटीएम बसवले होते. मात्र, ते बसविल्यापासूनच बंद आहेत. याबाबत नागरिकांनी विचारणा केल्यावर एक दोनवेळा त्याची सुधारणा केली मात्र, त्यानंतरही हा एटीएम बंदच असतो, असे स्थानिक नागरिक, व्यावसायिक यांनी सांगितले.
याबाबत नगरसेविका किरण मंत्री म्हणाल्या, “घोरपडी येथील वॉटर एटीएमसाठी जवळच्याच मॅरेज हॉल म्हणजेच मंगल कार्यालातून वीज जोडणी केली आहे. त्यामुळे कार्यालयात एक-दोनदा झालेल्या शॉर्टसर्किटच्या घटनेमुळे त्याचा परिणाम एटीएमवर झाला आहे. तसेच, अनेकदा मोटार बिघाड झाल्यानेही ते बंद पडले. मात्र, त्यावर तातडीने काम करून आम्ही हे एटीएम सुरू केले.’
वॉटर एटीएमची लवकरच दुरुस्ती
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉटर एटीएमचे व्यवस्थापन संबंधिचा करार संपल्याने, एटीएमच्या व्यवस्थापनाचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात नुकतेच बोर्डातर्फे निविदा मंजूर करण्यात आल्या असून, लवकरच वॉटर एटीएम दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन ते पुन्हा कार्यान्वित होतील, अशी माहिती बोर्ड प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
एटीएम खरेदीत घोटाळा…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अडीच लाखात बसविलेला आहे. मात्र, तोच एटीएम कॅन्टोन्मेंट बोर्डाने साडेचार लाख रुपये प्रति एटीएम खर्च केले आहेत. म्हणजेच मुळ दराच्या दुप्पट रक्कम यासाठी खर्च केली आहे. या व्यतिरिक्त हे एटीएम सौरऊर्जेवर चालणारे असतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विजेवर आधारित एटीएम तेही बंदावस्थेत आहेत. त्यामुळे वॉटर एटीएम खरेदी ही नागरिकांची फसवणूक असून, या व्यवहारात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळेच याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी लष्कर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संजय कवडे यांनी केली आहे.