Water crisis in Marathwada – गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. याचा परिणाम सध्या दिसून येत असून मराठवाड्यात अनेक भागांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत आहेत. अजून उन्हाळा सुरुही झाला नाही तोवरच पाण्याचे गंभीर संकट नागरिकांसमोर आ वासून उभे ठाकले आहे. (Water crisis in Marathwada! Wells, borewells dried up; Wandering of citizens for water)
मराठवाड्यात लहानमोठे असे एकूण 877 प्रकल्प आहेत. यांची पाणी क्षमता 8155.12 द.ल.घ.मी. आहे. प्रत्यक्षात मार्च महिन्यात आतापर्यंत केवळ 2043.55 द.ल.घ.मी. म्हणजे 25.06 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात या प्रकल्पांमध्ये 4698.03 द.ल.घ.मी. म्हणजे 57.23 टक्के साठा होता. यंदा जून ते सप्टेंबर कालावधीत केवळ 85 टक्के पाऊस पडला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस झाला. मात्र, प्रकल्पांमधील साठा वाढण्यासाठी त्याचा फासरा उपयोग झाला नाही. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये सध्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा –
मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यात 181 गावे, 39 वाड्यांमध्ये 262 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात 120 गावे, 43 वाड्यावस्त्यांवर 199 टॅंकरद्वारे, बीडमध्ये 5, धाराशिवमध्ये 3 गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. अनेक गावांमधून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्येही मोठे पाणीसंकट निर्माण झाले आहे. पाण्याच्या गंभीर समस्येमुळे लोक गाव सोडून नातेवाईकांकडे रहायला जात असल्याचेही समोर आले आहे.
मराठवाड्यतील प्रमुख धरणे आणि शिल्लक पाणीसाठा टक्के –
जायकवाडी – 24 टक्के
येलदरी – 41 टक्के
सिद्धेश्वर – 57 टक्के
माजलगाव – 00
मांजरा – 10 टक्के
उर्ध्व पेनगंगा – 57 टक्के
निम्न तेरणा – 6 टक्के
निम्न मनार – 34 टक्के
विष्णुपुरी – 48 टक्के
निम्न दुधना – 10 टक्के
सिना कोळेगाव – 00