कोलकता – भाजप लोकशाही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court) देखरेखीखाली घ्याव्यात, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन (Senior Trinamool Congress leader Derek O’Brien) यांनी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर ( Election Commission) गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
ओब्रायन यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले आहे की, भाजप भ्रष्ट मार्गाने भारतातील निवडणूक आयोगासारख्या संस्था नष्ट करत आहे. भाजपला जनतेला सामोरे जाण्याची भीती वाटते आणि म्हणूनच त्यांनी विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी निवडणूक आयोगाचे पक्ष कार्यालयात रूपांतर केले आहे. त्यावर भाजपाने पलटवार केला आहे.
डीजीपी राजीव कुमार यांच्या बदलीने टीएमसी संतप्त
डेरेक ओब्रायन यांनी लिहिले की, ‘निवडलेल्या राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण करावे अशी आमची इच्छा आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी आपल्या एका आदेशात पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांच्यासह अनेक राज्यांच्या गृहसचिवांच्या बदल्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाने विवेक सहाय यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपला घटनात्मक संस्थांवर नियंत्रण ठेवायचे आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला.
भाजपचा पलटवार
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या डेरेक ओब्रायनच्या मागणीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, ‘डेरेक ओब्रायन आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना नवीन घटना बनवायची आहे. देशात निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे आहे. ममता बॅनर्जी सांगतील त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाचे काम चालणार नाही.
आगामी निवडणुकांत तृणमूलला अथवा ते ज्या आघाडीचा भाग आहेत, त्या इंडिया आघाडीला फारसा वाव असणार नाही, हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पक्षाचे नेते असंवैधानिक विधाने करत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी पश्चिम बंगालच्या डीजीपीसह सहा राज्यांच्या गृहसचिवांना हटवले. त्याबाबत अजूनही उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.