अहवालातून प्रशासनाची कबुली; पर्यायी स्रोत निर्माण होणे गरजेचे
पिंपरी – शहराला पाणीपुरवठा करणारे धरण नोव्हेंबर महिन्यातही शंभर टक्के भरले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक पाणी टंचाईच्या समस्येशी झुंजत आहेत. ही समस्या आणखी दोन वर्षे कायम राहणार असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहराला भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. थेट पवना धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणणे, रावेत बंधारा दुरूस्त करणे, नवीन बंधारा बांधणे, आदी मुख्य योजनांचा समावेश आहे. मात्र, या योजना पूर्णत्वास येण्यास किमान दोन वर्षे हवी असून तोपर्यंत पर्यायी स्त्रोत निर्माण होणे शक्य नाही, अशी कबुलीच महापालिकेने दिली आहे. त्यामुळे शहराला आणखी दोन वर्षे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील विविध प्रश्नासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेने सादर केलेल्या अहवालावरून ही बाब समोर आली आहे. पिंपरी – चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, शहर वाढीचा वेग आणि शहराच्या 20 टक्के भागात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या कारणांमुळे शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये नियमबाह्य पाण्याचे प्रमाणही 35 ते 40 टक्के आहे. या सर्वांचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठयावर होत आहे, धरण भरलेले असताना पाणी टंचाई कशासाठी असा प्रश्न नागरिकांबरोबर स्वपक्षीय नगरसेवकही विचारू लागल्याने सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. महापालिकेसाठी पवना धरणातून 6.55 टीएमसी इतके पाणी आरक्षित आहे.