मुंबई- देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत असतानाच बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाचं सावट निर्माण झालं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. त्यानंतर आता ‘मोचा’ या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर परिणाम होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘मोचा’ चक्रीवादळामुळं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील जिल्ह्यांवर होणार परिणाम-
बंगालच्या उपसागरात उद्या म्हणजेच १० मे रोजी येत असलेल्या मोचा या चक्रीवादळाचा विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांवर परिणाम होणार आहे. विदर्भात पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळं आता आधीच संकटात सापडलेल्या बळीराजाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भासह राज्यातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामानातही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.