मुंबई, दि. 19 – राज्यात काही दिवसांपासून तापमानाचा पारा चढला असून शरीराची लाहीलाही होत आहे. त्यातच वातावरणात बदल झाल्याने पुढील पाच दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा शक्यता मुंबईतील हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर राज्यातील एक-दोन ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांत साधारणतः 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशा प्रकारचे वातावरण मध्य महाराष्ट्रासहीत मराठवाडा आणि विदर्भात राहणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यातील वातावरणात मोठे बदल होणार आहेत. यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवरही राज्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.